ज्ञानेश्वर रायते, महान्यूज लाईव्ह
अनेक पक्षांमध्ये फोडाफोडी करूनही महायुतीची चाळण काही केल्या भरत नाही, मूळचे राष्ट्रवादी व शिवसेना अगदी क्षुल्लक करून ठेवले, तरी देखील महाराष्ट्राच्या मनात मात्र आताच्या घडीला महायुती पूर्वीसारखी जागा करून घेऊ शकत नाही. असे अनेक सर्वेक्षणे, अंतर्गत सर्वेक्षणे, खाजगी सर्वेक्षणे सांगू लागल्याने व स्थानिक पातळीवरील नेत्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे 2024 ची महाराष्ट्रातील निवडणूक भाजप आणि घटक पक्षाला जड जाईल या शक्यतेने दररोज नवनवीन समीकरणे जन्माला घातली जात आहेत.
गेल्या काही दिवसापासून वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन जाणार असल्याचे महाविकास आघाडी सांगत असली, तरी अजूनही महाविकास आघाडी आणि वंचितची भट्टी जमलेली नाही. किंबहुना ती जमण्याची शक्यता नसल्याच्या बातम्याच जास्त प्रमाणात झळकू लागल्या आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा एक मोठा अपेक्षित असलेला व सरकारच्या विरोधात मतदान करू पाहत असलेला मतांचा गठ्ठा बाजूला जाईल आणि दुसरीकडे आरक्षणाच्या लढाईत सरकारच्या विरोधात गेलेली मराठा मते ध्रुवीकरण केल्यास महायुतीला ही निवडणूक सोपी जाईल असे आडाखे बांधले जात आहेत. त्यातून अनेक शक्यता तपासून दररोज नव्या नव्या गोष्टी जन्माला येत आहेत.
अशाच परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी सरकारचा विरोध या नावाखाली तसेच निवडणुका बॅलेट पेपरवर हव्यात ही भूमिका मांडून प्रत्येक मतदारसंघातून 1000 उमेदवार उभे करण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याला तितकेसे यश येत नसल्याचे पाहून, आता प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार म्हणून उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात यामध्ये पूर्वीच्या महायुतीतीलच बंडखोर व जास्त प्रभाव असलेले नेते निवडले जात आहेत, हे आणखी एक विशेष! या माध्यमातून तिरंगी लढती प्रत्येक लोकसभा मतदारसंघात लढवून मराठा आरक्षणाच्या लढाईत जे मराठा महायुतीच्या विरोधात आहेत, त्यांच्या मताचे ध्रुवीकरण करण्याचा देखील एक आखणी करण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.
नुकतेच पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली. आता या उमेदवारीला मराठ्यांचे उमेदवार अशी एक कल्पना देण्याची मोहीम तेजतर्रार झाली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अशा प्रकारे उमेदवार उभे करून जो वाद मराठा विरुद्ध ओबीसी असा घडवता आला नाही व त्यातून जो परिणाम साधायचा होता, तो परिणाम आता अगदी विनासायास या लोकसभा निवडणुकीत साधता येईल. थेट मराठा मतांचेच ध्रुवीकरण करून हा परिणाम साध्य करता येऊ शकतो, अशा स्वरूपाची आखणी यामध्ये झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे अथवा वंचित बहुजन आघाडी व मराठा उमेदवार एकत्र लढल्यास महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी व मराठा उमेदवार अशा लढतींचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जे सरकार विरोधातील वातावरण आचारसंहिता सुरू होईपर्यंत होते, ते वातावरण शेवटपर्यंत कायम टिकवण्यात महाविकास आघाडीला यश येईलच असे सांगता येणार नाही.
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये असंतोष आहे. हे मतदान महाविकास आघाडीकडे जाण्याची अधिक शक्यता आहे, अशा परिस्थितीत या मताला वेगळी वाट करून दिली, तर महायुतीचा एक मोठा अडसर दूर होऊ शकतो, हे माहित असलेल्या धुरिणांनी वेगवेगळ्या चाणक्यांमार्फत नव्याने मोहीम आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या एकमेकांच्या उमेदवारांच्या यादीवर लक्ष ठेवून असलेल्या महाविकास आघाडी व महायुतीतील दोन्ही पक्ष बाजूला ठेवून नवी समीकरणे जन्माला घालण्याची व महाराष्ट्रात पुन्हा 2019 प्रमाणेच मोदींचे कमळ फुलवण्याची एक नवी मोहिम अचानक सुरू झाली आहे.











