विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
भाजपचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काल बारामतीत महायुतीच्या समन्वयाची बैठक घेतली. या समन्वयाच्या बैठकीनंतर त्यांनी आमचा शरद पवार यांना हरवणे हाच एकमेव अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. तसेच शरद पवार यांनी मोदींचा अपमान केला असल्यामुळे त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शरद पवारांना हरवायचे आहे असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सुचित केले. या संदर्भात आज सुप्रिया सुळे यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.
सुप्रिया सुळे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, गेली 50 वर्षे शरद पवार या व्यक्तीला व नावाला हरवण्यासाठी आरएसएस व भाजप अजेंडा राबवत आहे. गेली अनेक वर्षापासून त्यांच्या पोटात हा अजेंडा होताच तो आता फक्त ओठावर आला एवढेच! बाकी त्यांची राजनीती घाणेरडी व गलिच्छ आहे
इंदापूर मध्ये एका गुंडावर गोळीबार झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात विचारले असता, त्यांनी सांगितले की, या राज्यातील सरकारच्या काळामध्ये गुन्हेगारीचा दर अतिशय वाढलेला असून हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. अर्थात मी सातत्याने गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाबद्दल विचारले असता, राज्यातील गृहमंत्र्यांना राग येतो. मात्र ज्या पदावर ते आहेत, त्यांना प्रश्नही विचारायचे नाहीत का?
दुसरीकडे काल श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत भाषण केले या भावनिक भाषणाची राज्यात चर्चा सुरू आहे. या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांनी केलेले भाषण हे टीका म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांच्या लोकांमध्ये जाऊन आपले मन मोकळे केले. आपल्या मनातील गोष्टी आपल्या जवळच्या लोकांशीही बोलायच्या नाहीत का? एवढेही स्वातंत्र्य उरलेले नाही का? श्रीनिवास दादा व शर्मिला वहिनी हे गेली अनेक वर्षे माझा प्रचार करतात. ते काल काटेवाडीत आपल्या जवळच्या लोकांशी बोलत होते. आपल्या जवळच्या लोकांपुढे त्यांनी आपले मन मोकळे केले, एवढेच त्याबाबत बाबतीत मी म्हणू शकेल.
इलेक्ट्रॉनिक बॉंड हा अतिशय मोठा घोटाळा असून त्याची श्वेतपत्रिका सरकारने आणली पाहिजे. कारण जे देशांमध्ये गॅम्बलिंग करत आहेत, जुगार खेळत आहेत, अशा कंपन्या देणग्या देतात आणि संस्कारी म्हणवून घेणारे पक्ष स्वीकारतात हे अतिशय दुर्दैवाचे आहे. ज्या कंपनीची उलाढाल 500 कोटींची आहे, त्यांनी 1300 कोटींची देणगी देणे हा एक प्रकारचा मनी लॉन्ड्रींगचाच भाग आहे, त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे असे देखील सुळे म्हणाल्या.











