अॅड. सचिन वाघ, बारामती.
खूप साऱ्या कहाण्या आपल्या अवतीभवती फिरत असतात. आपणही अनेक वेळा त्या कहाण्यांचा भाग असतो. कधी कधी तर आपणच एक कहाणी असतो. फक्त ती नजर पाहिजे कहाणी शोधणारी, ते कान पाहिजेत कहाणी ऐकणारे…! आमचं लहानपण ज्या गावात गेलं ते गाव, तिथली लोकं एक रंजक कहाणीची पात्रं असावेत अशी आहेत.
आता मागे वळून बघताना लक्षात येतं की पुस्तकात वाचलेली, सिनेमात पाहिलेली, आयुष्याच्या महत्वाच्या काळात मनावर खोलवर परिमाण करणारी ही आपली माणसं किती महत्वाची होती!
जसं सगळ्या खतरनाक गोष्टीनी भरलेले आटपाट नावाच नगर असतं, तसच आमचं लिमटेक एक खेडे होतं. गुण्यागोविंदाने राहणारेच लोक तिथे होते असं नाही, तर नस्ते उद्योग करणारेही खुप होते, अर्थात आपल्याच मस्तीत जगणारे, स्वतःची खासियत जपणारे! म्हणजे कसं की, पु.ल. देशपांडे जर आमच्या लिमटेकला आले असते ना, तर त्यांचं व्यक्ती आणि वल्ली अजून बहारदार झालं असतं.!
झुणझुण्या असंच एक पात्र. झुणझूण्या नावावरून लक्षात यावं. हाडाचा पारधी असणारा हा माणूस डोळे कावेबाज, हसण छद्मी, सोंग भिकाऱ्याचं घेईल, पण राजाच्या धुंदीत जगणारा, जमातीने आखून दिलेल्या एका मोठ्या प्रांताचा अलिखित राजा होता झुणझुण्या!
त्याची प्रजा कधी कधी त्याच्या मागे गावात यायची. कित्तेक बायका मूलं, मुली संगतीला. झाडाच्या पाल्यापासून ते कुणाच्या दावणीला कोणती गाय व्यालीय याचीही खबर झुणझुण्याला असायची. झुणझुण्या आत्ता थकलाय…परवा एका हॉटेलच्या बाहेर दोन पाय दुमडून बसलेला दिसला. मी त्याला ओळखलाच नाही. पण त्याचे डोळे कसे विसरू शकेल? जबरदस्त करारी. आजही बघितलं तरी हा घातकी माणूस आहे, असं बघता क्षणी वाटेल असला तो झुणझुण्या.
माझ्या नजरेसमोरून सर्रकन लिमटेकचं माझं लहानपण उभ राहून गेलं. तो काळ झुणझुण्याच्या दहशतीचा होता. झुणझुण्या चालत चालत कश्याची चोरी करलं याचा नेम नव्हता असं सांगितलं जायचं. तो कधी कोणाच्या रानात किती वाजता दिसलं याचाही नेम नव्हता. आम्ही जरी घरी घरच्यांच काही एकत नसलो, तर घरचे ही म्हणायचे गिळ पटकन झुणझुण्या येईन. अशी झुणझुण्या ची दहशत असायची.
आमचे नाना त्याचे अनेक किस्से सांगायचे कोणाची सुगी झाली, अन् गहू, ज्वारी रानात असली की, रातोरात झुणझुण्या अन त्याचे साथीदार पसार करायचे. त्यांचं वास्तव्यच रानात. सहसा कधी पोलिसांना सापडायचा नाही. लांबची चोरी करायला त्यांनी पाळलेल्या अन शिक्षित केलेल्या विशिष्ट गायी असायच्या. त्यावरून रात्रीचा प्रवास असायचा. अश्या वेळी जर रानात एखाद्याची गाठ पडली तर पुढचा माणूस हातपाय गळपटून पडायचा. परंतू आमच्या रानात सुगी असल्यावर नाना झुणझुण्यालाच राखण रहा म्हणायचे. झुणझुन्या गावात ठराविक लोकांचा आदर करायचा, त्यात नाना असायचे.
तो बोलताना सगळ्यांनाच आरे तुरे बोलायचा.. एकदा त्याने जबरी चोरी केली होती. परंतु त्याच्या चलाखीमुळं पोलिसांना कोणी केली हे सापडत नव्हतं. परंतू ज्या घरातली चोरी केली होती, ते घर शेतातल होतं अन् पिकाला पाणी दिल्याने भिजलेलं होतं. चोरी करून खिडकीतून खाली उतरताना त्याच्या पायाचे ठसे उमटलेले होते. त्याच्या त्या पायाच्या ठस्यांवरून पोलिसांनी त्याला अटक केली. नाहीतर झुणझुण्याने सगळ्यांच्या हातावर तुरी दिली होती अशा तुऱ्या त्याने अनेकदा दिल्यात.
खरंतर सामाजिक स्थिरता नाही. घर नाही. शाश्वत अस काहीच नाही, मग फक्त मनगटातल्या रगीवर आणि डोक्यातल्या आगीवर जगणाऱ्या इतर बऱ्याच जणांसारखं झुणझुण्यानेही अनेकदा विंचवाचं तेल पचवून अनेक अन्याय सहन करत आयुष्याचा अध्याय आता शेवटाला आणलाय. आमच्या गावात त्याला कायमच घर मिळालंय. धोंडशीर तुटल्याने झुणझुणया लंगडत चालतोय, 10 वी पर्यंत कष्टाने शिकवलेला पोरगा जेल मध्ये आहे. त्याच दुःख आणि आदीपुरुषांचा अनुभव घेऊन झुणझुण्या काळ बदलायची वाट पाहत जगतोय.
खरोखरंच काळ सरकत जातो. सगळं बदलत जातं. माणसाने जगलेल्या आयुष्याच्या कहाण्या तश्याच राहतात. झुणझुण्या दिसला तरी घरात दरवाजा मागं आम्ही लपायचो. तो काळ आजही माझ्या नजरेस आहे. नंतरच्या काळात त्याच्या आयुष्यात काय घडलं याची मला जास्त काही माहित नाही. पण काळ सरकत गेला त्याची दहशत संपत गेली, पण त्याची नजर आज ही तीच आहे, जबरदस्त करारी!
आमच्या लहणपणाच्या जडणघडणीवर झुणझुण्याचा अमीट ठसा आहे हे मान्य करावे लागेल. त्याच्या बद्दलच्या भीतीची जागा दयाबुध्दीने घेतली असली, तरी त्याच्याबद्दलचा निरागस भीतीयुक्त आदर आजही कायम आहे.











