पंकज पाटणकर, बारामती. (75884 23113)
अहो खरंच काहीच समजायला मार्ग नाही. काय चाललंय इथे नेमके. म्हणजे बघा; CBSE शाळा म्हणजे फक्त आणि फक्त अभ्यासाचा मळा! हो की नाही? इथे इतर गोष्टीला वाव नाही आणि भाव ही नाही, असाच एकूण समस्त समजाचा समज. आणि अलीकडे तर वेगवेगळ्या reels आणि जाहिराती टाईप व्हिडिओ मधून इंग्रजी शाळांमध्ये पोरं शिकतात म्हणजे त्यांना व्यवहारज्ञान, समाजभान हे खूपच कमी असते असा एक समज पसरवण्याचा प्रयत्न असतो.
सीबीएसई मध्ये मुलांना अभ्यासच इतका असतो की इतर ॲक्टिविटीमध्ये त्यांना भाग घ्यायला, प्रॅक्टिस करायला, वेळच मिळत नाही, अशीच साधारण तक्रार सगळीकडे असते. मात्र काल सीबीएसई शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला आणि इंग्रजी माध्यम किंवा विशेष करून केंद्रीय अभ्यासक्रम घेतलेल्या शाळा या आपल्या संस्कृती पासून दूर जाताहेत का ? या आणि अशा इतर सगळ्या गैरसमजांना छेद गेला.
‘अतुल्य भारत’ या एका अद्भुत विषयावर हा सांस्कृतिक महोत्सव बेतला होता. कुठेही कसलाही बटबटीतपणा नाही आणि प्रत्येकाला आपण करत असलेल्या भूमिकेची उत्तम समज आहे, हे ते ज्या पद्धतीने काम करत होते, त्यावरून जाणवत होत. एक छोटंसं उदाहरण देतो, अहो रामायणातील वानरसेना जेंव्हा बाहेर आपल्या नंबरची वाट बघत उभी होती, तेंव्हा ते एकमेकांच्या शेपट्यांना धरून उभे होते म्हणजे बघा😀😀!
मी स्वतः खर सांगायचं, तर फक्त माझ्या मुलीचा परफॉर्मन्स बघून निघायचं असे ठरवून गेलो होतो पण पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत अजिबात उठावे वाटले नाही इतका सुंदर कार्यक्रम झाला.
सुरुवातीला सादर झालेली गणेश वंदना (ज्यामध्ये आमची कन्या होती😀) पुढील कार्यक्रम कसा असेल याची नांदी देऊन गेली.
रामायणापासून ते चांद्रयानापर्यंतचा हा प्रवास खूप प्रेक्षणीय आणि श्रवणीय होता. गदिमा यांच्या नावे असणारे हे सभागृह खूप आनंदी झालं असेल, जेंव्हा त्याने या पिटूकल्यांना गीतरामायण यावर सुंदर नाच करताना पाहिलं असेल आणि यात नाविन्यता आणि परिपूर्णता इतकी होती की, प्रत्येक क्षण एखाद्या फोटो सारखा फ्रेम करून ठेवावा असे वाटत होते.
यानंतर महाभारत या विषयावर सादर करण्यात आलेले नृत्य तर एकदम रोमांचकारी होते. एकदम लाजवाब! आरंभ हे प्रचंड या गाण्यावर मुलांनी जी काही मस्त नृत्य अदाकारी केली! खरंच ती कल्पनातीत अशीच झाली. त्यानंतर झालेले मध्ययुगीन काळातील थीम वर आधारित पंजाबी सुफी आणि वारी हे नृत्याविष्कार तर एवढ्या मोठ्या थिएटर पेक्षाही मोठे वाटावेत असे झाले. शब्द नाहीत त्याला.
अहो मी इतके दिंडीवरचे कार्यक्रम पाहिले आहेत पण स्टेजवर दिंडी मधला सर्वोच्च क्षण म्हणजे रिंगण पहिल्यांदा पाहिले. काय सुरेख रिंगण केले मुलांनी केवळ अप्रतिम! पण हे असे खूप सांस्कृतिक संस्कारित दाखवत राहिलं, तर वास्तवापासून काल्पनिकतेकडे जाणारा प्रवास वाटला असता.
कारण काहीही झालं तरी आजची ही किशोर पिढी डान्स नंबर आणि आयटेम साँग अश्यावरच मनमुराद थिरकते. या साठी शाळेने निवडलेली कल्पना तर खूपच अफलातून आणि अनेक शाळांनी अनुकरण करावे अशीच होती. नाचण्यासाठी योग्य असे गाणे निवडायचे, पण त्याचे कनेक्शन एकदम आपल्या उच्च मूल्यांशी लावायचे ही कल्पनाच खूप भन्नाट होती. म्हणजे जय हो हे गाणे नाचायला लावायचे आणि त्याचवेळी आपले सगळे नोबेल विजेते शास्त्रज्ञ आणि भारतरत्न आठवायचे काही भारी कनेक्ट होतो ना. मस्तच!
अगदी अशीच गोष्ट चंद्रावर असणाऱ्या गाण्यांची तेरे वास्ते मैं चांद लाऊंगा असे म्हणताना इस्त्रो आणि चांद्र मोहीम आठवायची कसलं भारी ना हे.
सगळच स्वतः करायचं की काही आऊट सोर्स करायचं याच योग्य भान आणि ज्ञान या निमित्ताने मुलांना झाले. कारण ही बाहेरची गाणी निवडणे, नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी मार्गदर्शन घेणे, हे करत असतानाच शाळेच्या स्वतःची ओळख असणाऱ्या बँडने पण खूप सुंदर सादरीकरण केले. यात तबला, बासरी ते पाश्चिमात्य वाद्य जसे पियानो, युकेले, हेही विद्यार्थ्यांनी वाजवून दाखवले.
असा हा सुंदर कार्यक्रम सहज होत नाही. या मागे असतात अविरत कष्ट , मुलांना शनिवार रविवार सुध्धा सुट्टी ना देता स्वतः सुट्टी न घेता शाळेतील शिक्षक वर्गाने झोकून देऊन काम केले यामुळेच असा सुंदर कार्यक्रम होऊ शकला. प्राचार्या कोरे मॅडम, अनिता दास आणि संपूर्ण सांस्कृतिक संयोजन समितीचे खूप खूप अभिनंदन!











