बारामती : महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्याचे सुपुत्र व काश्मिरमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे यांनी डोडा जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी केलेल्या पॅटर्नची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत त्यांच्या कामाचा गौरव केला होता. आता उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात तहसीलदार असलेले बारामती तालुक्यातील ढेकळवाडीचे सुपूत्र डॉ. तुषार दादासाहेब बोरकर यांनीही अशीच भन्नाट कामगिरी केली आहे. गावागावात दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या रॅपीड टेस्ट कॅम्पचा या तालुक्यात मोठा फायदा झाला.
तरुण अधिकारी नक्कीच भन्नाट कामगिरी करतात. भूम तालुक्यात योगायोगाने सारे अधिकारी तरूण असल्याने त्यांची जुळलेली विचारधारा या तालुक्यातील कोरोना रोखण्यासाठी कमालीची उपयोगी पडली आहे. डॉ. तुषार बोरकर यांचा समन्वय साधण्याचा स्वभाव, उत्तम संघटनकौशल्य आणि प्रशासकीय कामकाजावरील पकड यामुळे तालुक्यात सामूहिक यशस्वी कामगिरी साधत त्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक प्रगत तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भूम तालुक्यात आठ महिन्यात कोरोनाचे ६२२ रुग्ण आढळले असून त्यापैकी तब्बल ५०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या तालुक्यात अॅक्टीव्ह कोरोनाग्रस्तांची संख्या ९९ आहे. तर कोरोनावरील उपचारादरम्यान मृत झालेल्यांची संख्या १४ एवढी आहे.
कोरोनाची महामारी थोडी संधी मिळाली की, उच्छाद मांडते आहे, हे सर्वजणच अनुभवत आहेत. अगदी पहायला गेल्यास बारामती, इंदापूरसारख्या तालुक्यांमध्ये दोन दोन वेळा लॉकडाऊन करावे लागले आहे. त्यामुळे कोरोनाला थोडी संधी मिळाली की, कोरोना फैलावतो हे साऱ्यांनीच अनुभवले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्याचा एक आराखडा केला. यामध्ये कोरोना रोखण्यासाठी आक्रमक उपाययोजना सुरवातीपासूनच राबविण्याच्या सूचना केल्या आणि त्यानंतर भूम तालुक्यात प्रांताधिकारी मनिषा राशीनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. तुषार बोरकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांना सूचना केल्या. गटविकास अधिकारी राजू कांबळे, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी दिपक इंगोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिनगारे यांच्यासमवेत त्यांनी गावांची, महत्वाच्या ठिकाणची पाहणी केली.
काय होते मॉडेल?
सुरवातीस ग्रामीण भागात गावनिहाय, गल्लीनिहाय, शहर व गल्ल्यांनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये जे सहव्याधीग्रस्त (म्हणजे मधुमेह, अस्थमा, रक्तदाब, कर्करोग, एचआयव्ही) रुग्णांची संख्या निश्चिती केली. त्यांची यादी बनवून त्यांना चाचणी सक्तीची केली. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या याद्या तयार केल्या. त्यानुसार हॉटस्पॉट शोधून तेथे रॅपीड टेस्ट कॅम्प घेतले. रुग्णांनी त्यांच्या गरजेनुसार दवाखान्यात येण्यापेक्षा तेथे पोचून अॅक्टिव्ह सर्वे करून रुग्णांपर्यंत पोचून त्यांना शोधण्याची शिकस्त मग शासकीय पथकांनी केली. त्यानंतर इतर गावे, शहरांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण नसलेल्या ठिकाणीही व्यावसायिक, विक्रेते, थेट संपर्क येणाऱ्या व्यक्ती यांच्यासाठी नगरपरीषदेत रॅपीड टेस्ट कॅम्प घेतले. त्याचा परिणाम दिसून आला. आज येथील शासकीय यंत्रणेवर मोठा ताण नाही. त्याला कारण येथील शासकीय यंत्रणेने वेळीच उपाययोजना केल्या आणि नागरिकांना आश्वस्त केले. कोरोनाची भीती नाही, तर दक्षता घेण्यासाठी शिक्षित केले. योग्य जनजागृती हे देखील त्यांच्या या उपाययोजनेचे वैशिष्ठ्य ठरले. कोणत्याही परिस्थितीत गावशिवारातील माणूस कोरोनाची अनाठायी भीती घेणार नाही, दक्षता घेईल यासाठीचे वातावरण त्यांनी तयार केले.
डॉ. तुषार बोरकर, तहसीलदार भूम (जि. उस्मानाबाद) – खरे म्हणजे या जिल्ह्यात सगळ्या तालुक्यांमध्ये ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यात वेगळे काही नाही. मात्र कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजना महत्वाच्या ठरल्या. लोकांना दिलासा मिळाला. वरिष्ठांचे मार्गदर्शन, शासकीय यंत्रणा, राजकीय प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न व सामान्य जनतेने त्याला दिलेला उत्तम प्रतिसाद यांचे हे सामूहिक यश आहे. विशेष म्हणजे तालुक्यात एक पोलिस एक गणपती अशी घोषणा केली, तर सर्व गावांनी, मंडळांनी त्यास प्रतिसाद देत गणेशोत्सवही अशाच प्रकारे साजरा केला.











