नवी दिल्ली – आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार येत्या 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय राहणार नाही असे ठामपणे सांगत सोळा कलमी कार्यक्रमच जाहीर केला. शेतीला केंद्रस्थानी ठेवण्याचा इरादाही त्यांनी बोलून दाखवला.
आजच्या अर्थसंकल्पात सितारामन यांनी मांडलेला 16 कलमी कार्यक्रम हा शेती व शेतीची निगडीत आहे, यामध्ये 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद ही शेती क्षेत्रासाठी केली असल्याचे सितारामन यांनी स्पष्ट केले. यानुसार कृषी पंपांना सौर उर्जेशी जोडणारा पीएम कुसुम (प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा उत्थान महाअभियान) हा कार्यक्रम राबवला जाणार असून देशातील 20 लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप हे सौर उर्जेवर चालणारे असतील. देशातील 100 जिल्ह्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे. मासेमारीला उत्तेजन देण्यासाठी सागरमित्र योजना, देशाचे मत्स्यउत्पादन 200 लाख टनांवर नेण्याचे उद्दीष्ठ. शेतमालाच्या वाहतूकीसाठी खास किसान रेल. यामध्ये शीतगृहाचे कोच जोडले जाणार. नाशवंत शेतमालासाठी कृषी उडान योजना. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही योजना राबवली जाणार. शेती, सिंचन व गावविकासासाठी 2.83 लाख कोटी. शेती कर्जाची मर्यादा 15 लाख कोटी. जलजीवन अभियानासाठी 3.6 लाख कोटी. दुग्धोत्पादन दुप्पट करण्यासाठी खास योजना सुरू करणार. देशभरात नाबार्ड उभारणार गोदामे आणि शीतगृहांची साखळी. फलोत्पादनासाठी एक जिल्हा एक उत्पादन, क्लस्टर वरती भर देणार. झिरो बजेट शेतीवर भर देण्याचा संकल्प. महिला शेतकऱ्यांसाठी धान्यलक्ष्मी योजना, बिजोत्पादनाच्या योजनांमध्ये महिलांना जोडणार. मॉडर्न अॅग्रीकल्चर अॅक्ट लागू करणार. 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ देणार. खतांच्या संतुलित वापरासाठी 6 हजार कोटींचा भारत नेट कार्यक्रम.










