कोरोना संसर्गजन्य परिस्थितीतील रागिणी फाउंडेशनचा अभिनव उपक्रम; महिलांच्या कलागुणांना मिळाला वाव
बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील रागिनी फाऊंडेशनच्या वतीने नागपंचमी आणि श्रावण मासारंभ निमित्त खास महिलांसाठी उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बारामतीच्या सौ.अलका शरद रसाळ यांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेसाठी कोरोना जनजागृती हा विषय देण्यात आला होता. ‘ सध्या करून संसर्गजन्य परिस्थितीमुळे कोणतेही सण आपण एकत्रित येऊन साजरे करू शकत नाही, त्यामुळे महिलांना सणांचा आनंद घेता यावा, आपले कलाकौशल्य जोपासता यावे आणि प्रसिद्धीच्या इतर माध्यमां बरोबरच उखाणा या माध्यमातूनही जनजागृती व्हावी या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी दिली
या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी भाग घेऊन कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता, तोरणा संसर्गजन्य परिस्थितीत डॉक्टर, नर्स, प्रशासन, पोलीस, आरोग्य कर्मचारी, प्रसारमाध्यम यांचे योगदान त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाययोजना कशा पद्धतीने केल्या पाहिजेत, कोरोना चा मानवी जीवनावर होणारा परिणाम, सोशल डिस्टनसिंग चे पालन, मस्कचा वापर, सॅनेटायझर चे महत्व या सर्वांचा समावेश असलेले उखाणे सादर करायचे होते. ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती. ह्या स्पर्धेसाठी महिलांनी स्वतःचा पारंपारिक वेशभूषेतील उखाणा सादर केल्याचा व्हिडीओ पाठवायचा होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक – सौ.अलका शरद रसाळ (बारामती), द्वितीय क्रमांक -सौ .प्राची राहुल गोडसे (वालचंदनगर), तृतीय क्रमांक – सौ.जयश्री सचिन वाघ (तक्रारवाडी,भिगवण) यांनी मिळवले, तर उत्तेजनार्थ म्हणून सौ. अर्चना आनंद थोरात (गोंधळेनगर,पुणे), सौ.अंजली राम वणवे (बारामती), सौ.तृप्ती सागर रविकीर्ती (पुणे), लता अमोल जगताप (पणदरे) यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये हडपसर, पुणे, उरळी कांचन, पणदरे,वडगाव निंबाळकर, बारामती, वालचंद नगर, भिगवण येथून महिलांनी सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेसाठी बक्षीस सौजन्य श्री महालक्ष्मी फर्निचर मॉल यांचे होते. या स्पर्धेसाठी शीला पारेख, सीमा हिरवे, नितीन पारेख, दिनकर आगम आदींनी नियोजन केले.










