बारामती : महान्यूज लाईव्ह
कालपासून सर्व माध्यमांमध्ये पार्थ पवार आणि शरद पवार ही दोनच नावे चर्चेत आहेत, त्यातून राष्ट्रवादीत बेबनाव आहे असा अप्रत्यक्ष सूर मुंबईतल्या पावसामध्ये पत्रकार व्यक्त करताहेत, अशातच राष्ट्रवादी मात्र मोठा भूकंप करण्याच्या तयारीत असून आपले गेलेले गयाराम भाजपमधून पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे.
पार्थ पवार यांनी सुशांतसिंह रजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी मागणी करून राज्यात गोंधळ उडवून दिला होता, त्याची चर्चाही खूप झाली. पार्थ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे व राज्याचे गृह खाते राष्ट्रवादी कडेच असल्यामुळे याची आधी चर्चा झाली, मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जेव्हा प्रश्न विचारला आणि त्यांनी नातूच्या म्हणण्यास कवडीची किंमत देत नाही असे उद्गार काढून राज्यात सर्व माध्यमांचा व चर्चेचा फोकस पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर करून घेतला. त्यातून अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा माध्यमांमधील प्रतिनिधी करू लागले, त्याच वेळी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची बैठक सुरू होती, या बैठकीत इतर मुद्द्यांप्रमाणेच भारतीय जनता पक्षात गेलेल्या आपल्या आमदार माजी आमदार व पदाधिकाऱ्यांना पुन्हा राष्ट्रवादीकडे आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हे सर्वजण राष्ट्रवादीकडे परतण्यास इच्छुक आहेत, त्यामध्ये राज्यसभेच्या खासदारांसह 12 आमदारांचा समावेश आहे. राजस्थानमधील तसेच मध्य प्रदेश मधील विरोधी सरकारबाबत भाजपने घेतलेल्या भूमिकेचा विचार करता यापुढील काळात सरकारपेक्षाही अगोदर राष्ट्रवादी अधिक सशक्त असली पाहिजे या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकीकडे जेव्हा सर्व माध्यमांच्या चर्चा ही राष्ट्रवादीतील कथित वेबनावाशी संबंधित सुरू होती, तेव्हा पडद्यामागे मात्र राष्ट्रवादीतील धोरणकर्ते राष्ट्रवादी अधिक मजबूत करण्याच्या विचारात होते.










