संपादकीय
गेल्या काही दिवसांपासून व्हाटसअपसह सोशल मिडियात वेगवेगळे व्हिडीओ व ऑडिओ क्लिप फिरत आहेत. विनालक्षणांचे कोरोना रुग्ण अगदी मजेत आपण क्वारंटाईन एन्जॉय करतो आहोत हे अगदी रसभरीत वर्णन करून सांगत आहेत. मात्र त्यावरच भरोसा ठेवून कोरोना हे एक षडयंत्र असल्याची एक पध्दतशीर अफवा जी पसरवली जातेय त्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
अनेक ठिकाणी लवकर दवाखाना न गाठल्याने चांगले, एरवी सदृढ वाटणारेही रुग्ण कोरोनाग्रस्त झाल्यानंतर अत्यवस्थ झाल्याच्या, किंबहूना जगातून गेल्याच्या घटना आपल्या अवतीभोवतीही घडत आहेत. त्यामुळे विनालक्षणाचे जे रुग्ण आहेत, त्यांची मजा सुरू आहे, तर सुरू राहू द्या..किंबहूना ते मजा मारत आहेत, म्हणूनच रस्त्यावर किंवा गावागावात इतरांना कोरोना झालेला नाही, अन्यथा हेच विनालक्षणाचे रुग्ण आपल्याला काहीच नाही, म्हणजे कोरोना नाही असे समजून स्वतःला वाघ समजून गावभर हिंडून जे प्रकृतीच्या बाबतीत कमजोर आहेत, त्यांना उध्वस्त करून राहीले असते.
आता मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे आजवर ज्यांना कोरोना झाला, ते नशीबवान आहेत. यावर अनेक जण टिकाटिप्पणी करतील, परंतू हे वाक्य आता शहरी भागानंतर ग्रामीण व निमशहरी भागातही प्रत्ययास येऊ लागले आहे. तालुक्याच्या ठिकाणी सर्वप्रथम कोरोनाचे रुग्ण आढळू लागले, ते लॉकडाऊनची शिस्त थोडीशी थिथील झाल्यानंतर..! कोरोनाचा प्रभाव असलेल्या पुणे, मुंबईतून अनेक जण आपल्या गावी, पाहुण्याच्या आश्रयाला येऊ लागले आणि दोन महिने जखडून ठेवलेला कोरोना हळूहळू गावात, वाड्यावस्त्यांवर पोचला.
अगदी हे गृहीत धरून खरेतर तालुक्यांच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर्स तयार करण्यात आली. ती सध्या कार्यरतही आहेत. मात्र प्रत्येक तालुक्यांचा अंदाज घेतला किंवा माहिती घेतली तर ही कोविड केअर सेंटर आता हाऊसफुल्ल झाली आहेत. थोडक्यात हळूहळू ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरू लागला आहे आणि कोविड केअर सेंटर सोडा, तालुक्याच्या ठिकाणी व्हेंटीलेटर्सची मर्यादा दिसू लागली आहे.
आता येणाऱ्या दिवसांत कोरोनाचे रुग्ण जसजसे वाढत जातील, तसतसे आज ना-ना म्हणणारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ही कोविड रुग्णालये बनून जातील. आज ज्याप्रमाणे शहरी भागात केवळ बेड उपलब्ध करण्यासाठी मंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत व उच्चपदस्थांपर्यंत वशिले लावण्याची वेळ येत आहे, तशी वेळ तालुक्यांच्या पातळीवरही येईल. अशावेळी खूप मोठ्या समस्या उदभवणार आहेत. ज्याप्रमाणे शहरी भागात व्हेंटीलेटर्स नसल्याने काही लोकांचे जीवावर बेतल्याच्या बातम्या आपण ऐकल्या, वाचल्या आहेत, तशी वेळ ग्रामीण भागातही येणार आहे. म्हणूनच आज ज्यांना कमी संख्येच्या काळात कोरोना झाला, ते नशीबवान आहेत, त्यांना वेळेत उपचार मिळालेत. वेळेसारखे उपचार चांगले मिळाले आहेत.
कोरोनाची लाट ग्रामीण भागात अजून यायची आहे, म्हणूनच त्याची भीषणता जाणून घेण्याबाबत आपण अजूनही अज्ञान बाळगतो आहोत किंवा ते जाणून घेण्याची मानसिकता आपली अजून झालेली नाही. मात्र संकट देशपातळीवरून राज्य पातळीवर, राज्य पातळीवरून जिल्हा, तालुका आणि आता गावापर्यंत पोचले आहे. बऱ्यापैकी तालुक्यांतील गावे कोरोनायुक्त होऊ लागली आहेत. त्याचा विचार करता फार थोड्या वेळात आपल्यामधील अनेक जण कोरोनाग्रस्त होतील व अशावेळी काहीच होत नाही अशा भ्रमात राहणेही धोक्याचे होईल.
देशात आता तासाला १ हजार रुग्णांवरून आपण आता २ हजार रुग्णांवर पोचलो आहोत. काही संस्थांच्या अनुमानानुसार कोरोनाची उच्चांकी लाट अजून यायची आहे व ती कित्येक पटीने मोठी असेल असे सांगितले जाते. ही भीती दाखवली जात नाही, ते वास्तव दाखवले जात आहे याचा विचार करूनच घरात रहा. सुरक्षित रहा. अगदी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा..











