१० रुग्णांमागे एकाचा मृत्यू.. १० जणांचा कोरोनाने घेतला बळी
बारामती : महान्यूज लाईव्ह स्पेशल
बारामतीत कोरोनाने आजपर्यंत दहाजणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंतचे मृत्यू आणि रुग्णांची संख्या पाहता १० रुग्णांमागे एकाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बारामतीकरांवर कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. त्याचवेळी आरोग्य प्रशासन कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बारामतीत पुन्हा एकदा सामूहिकपणे काम करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती कोरोनामुक्त करण्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.
बारामतीत आजपर्यंत तब्बल १०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत ६० पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बारामती शहरातील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. बारामतीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी म्हणून प्रशासनाने सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र लॉकडाऊनच्या काळात ४० हून अधिक व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतरही प्रशासनाच्या हाती अपयशच आल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत मार्चपासून जून महिन्यांपर्यंत कोरोनाला रोखण्यात यश आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेला बारामती पॅटर्न यशस्वी ठरला होता. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहर आणि तालुक्यात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पर्यायाने बारामतीत कोरोनाची दहशत निर्माण झाली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाकडून याबाबत कोणतेही गांभीर्य दाखवले जात नाही. याबाबत मागील आठवड्यात ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ना. अजित पवार यांच्यासमोर ही बाब मांडली होती. त्यावर अजितदादांनी आपल्या शैलीत प्रशासनाचा समाचार घेतला होता. काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा ना. अजित पवार यांनी दिला होता. शहर आणि तालुक्यातील कोरोना स्थितीबाबत स्थानिक पदाधिकारी सातत्याने विविध बाबी ना. पवार यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. त्यामुळे लागेल ती मदत ना. पवार उपलब्ध करून देत आहेत.
वास्तविक बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ना. अजित पवार यांच्यामुळे कोरोना उपचार केंद्र, तपासणी यासह अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना लागलीच निदान होऊन उपचारही मिळू लागले आहेत. परंतु हेवेदावे, एकमेकांना असहकार्याची भूमिका यामुळे कोरोना उपाययोजना राबवण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनात समन्वय नसल्यामुळे शहर आणि तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचीही चर्चा होऊ लागली आहे.
एकूणच, बारामती म्हटले की ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची नावे पुढे येतात. त्यामुळे कोरोना संकटाच्या काळात बारामतीच्या नावलौकीकाला साजेल असे काम प्रशासनाकडून व्हायला हवे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरीक व्यक्त करीत आहेत.
ठोस उपाययोजनांची गरज..!
बारामतीतील सद्यस्थिती पाहता वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या आणि लक्षणीय मृत्यूदर याकडे आता प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळात जास्तीत जास्त उपाययोजना राबवण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे. मागील काळात प्रशासनाने दाखवलेले गांभीर्य, पदाधिकाऱ्यांची साथ आणि नागरिकांनी दाखवलेला समंजसपणा यामुळे बारामती कोरोनामुक्त झाली. आताही त्याच पद्धतीने कामकाज करून पुन्हा एकदा बारामतीला कोरोनामुक्त करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे.
खासगी डॉक्टरांचा सहभाग वाढायला हवा..!
बारामतीत सध्या वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोना निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. सध्या बारामतीत अनेक खासगी डॉक्टर्स कोरोनाच्या लढ्यात काम करत आहेत. मात्र एकूण संख्या पाहता खासगी डॉक्टरांचा कोरोनाच्या लढ्यात सहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच बारामती पुन्हा कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.
आरोग्यसेवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज
वास्तविक कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष आरोग्यसेवकांवर मोठी जबाबदारी असते. रुग्ण आढळल्यानंतरचे त्या-त्या भागात सर्वेक्षण, आजारी रुग्णांबाबत घ्यावयाची काळजी अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या आरोग्य सेवकांकडून पार पाडल्या जातात. सध्याच्या काळात या आरोग्यसेवकांना प्रोत्साहन देत त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांकडेही द्यायला हवे लक्ष..!
बारामतीत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून बारामती नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. त्या-त्या पातळीवर अधिक जोमाने काम करून स्वच्छता विभागाचे कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. त्यातही एखादा कोरोनाबाधित रुग्ण दगावला; तर त्याच्यावर अंत्यसंस्काराची जबाबदारीही स्वच्छता विभागातील कर्मचारी उचलत आहेत. मात्र अशावेळी अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान ७-८ दिवसांसाठी सुट्टी द्यावी लागते. पर्यायी कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत पुन्हा आहे त्याच लोकांवर अधिकची जबाबदारी पडते. त्यामुळे प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.










