
माहितगार..
आम्हास्नी फिरस्तीची लय हौस…कोरोनाच्या काळात लॉकडाऊन झालं आणि आम्हाला मोकळंढाकळं गाव कसं दिसतं, ते बघायची लहर आली..मग काय, आम्ही फटफटी काढली आणि चक्कर मारायला गेलो… आख्खा चौक भिकारदास बनला होता.. चिटपाखरू नव्हतं… असं कधीच झालं नव्हतं.. या कोरोनानं माणूस माणसात ठेवला नायी याची फार म्हणजे फार खंत वाटली… आपसूक डोळ्यात पाणी आलं..तेवढ्यात एक पोलिसदादा जवळ आला.. म्हणाला, काय बघतोयास?… रडतोस का?… मी भरल्या डोळ्यांनी त्यांस्नी उगीचंच हो, असं म्हणालो… मी उगीच म्हणालो खरं, पण आतून भरून आलं होतं..पोलिसदादाला मात्र मी नवटाक टाकून आल्यासारखं वाटलं.. आणि असा उगीच रडू नको बाबा… रडायचंच, तर त्याला कायतरी कारण पाह्यजी… म्हणत त्यानं आमच्या पाठीमागे दोन जोरात पाईप टाकले.. ह्यो रट्टा एवढा जोरात व्हता की, आम्ही धनुष्यबाणासारखंच ताणलो गेलो… पुन्हा दोन जोरात फटके बसले.. आणि खरोखरच रडायला लागल्यावर पोलिसदादानं, आंग अश्शी, असं रडायचं बाबा, असं सांगत, डोळं लाल करून, चल निघ इथून! असा इशारा दिला.. आणि आयशपथ सांगतो, चार रातीला आमची पाठ बिछान्याला टेकलीच नाही.. आमची फिरस्तीची हौसच फिटली.. तवापासून घरात जे लॉकडाऊन करून घेतलं..ते आजपतोर…!
………
आज मात्र मनाचा बराच निग्रह केला..बाहेर फिरायचंच म्हणालो..गावात आलो, तर वस्तीवरनं राम्या आलेला.. शहराकडं दवाखान्यात निघालेला..विचारलं तर त्याच्या पुण्याच्या भावाला शहरातल्या दवाखान्यात अॅडमिट केल्याची खबर दिली. भावासह भावजय अन दोन पोरं बी दवाखान्यात अॅडमिट केल्याती असं म्हणत त्यानं पैशाचा हिशोब सांगितला. प्रत्येकाचं तीन दिसाचं ५०-५० हजार बिल झालेलं.. चौघाचे दोन लाख भरायचे होते आज.., शिवाय अजून किती दिस ठिवणार माहित नव्हतं..मका, गहू विकून झाला, दोन गायी पण काढल्या बाजारात आणि भावजयीचं गळ्यातलं बी मोडलेलं.. त्यानं मला हे सांगितल्यावर कसंसच वाटलं…पण खरं सांगू का, माणूस कितीबी श्रीमंत असू दे नाहीतर गरीब, दवाखान्यापुढं माणूस पालापाचोळाच असतोया… म्हणून तर गावाकडं कुणी म्हणेचना … अय्योव, मला कोरोना झालाया…!!
……….
आज मी टिव्हीवर गंमत बघितली… तो करोडपतीचा सिलेब्रिटी ‘अय्योव मला कोरोना झालाया...' म्हणत टिव्हीवर आला होता… माझंच छाताड लय भरून आलं.. म्हणलं च्यामायला, लोकं म्हणतेत, कोरोना नको, ‘अन ह्यो बाबा, एखादं प्रवचन सांगितल्यासारखं आरामात सांगतोय की, मला कोरोना झालाया…’ तसंबी या लोकांकडं पैसा असतोच म्हणा.. त्यामुळं कोरोना झाला म्हणून पैशाकडं हे लोक बघणारच नाहीत… पण पुन्हा कळलं, यांच्याही घरात चार जणांना कोरोना झालाय..अरे बापरे, वस्तीवरच्या राम्याच्या भावासारखंच हे पण प्रकरण आहे असं वाटल्यानं ते काय सागंताहेत याच्याकडं डोळे लावून बसलो..
ते सांगत होते, या कलावती दवाखान्यातला स्टाफ एकदम देवासारखाच आहे, त्यांनी अत्यंत खूप चांगली सेवा दिलेली आहे, मी एकदम फाईन आहे असे सांगत असताना मी एकदम कल्पनाविश्वातच गेलो… डोळ्यासमोर स्वर्ग होता.. सारे देव माझ्याभोवती गोळा झालेत… कोणी मला हसतमुखाने सलाईन लावतेय, कोणी माझा ईसीजी काढतेय.. सगळीकडे तो नाटकात कसा धूर काढतात, तसाच सगळा धूर… पण डोळ्यात चुरचुरत नव्हतं… कोणीतरी हळूच सांगितलं की, तो ऑक्सिजन आहे, तुझ्यासाठी खास जास्तीचा लावलाय… आणि जेव्हा मी या साऱ्याचं पैसे किती? असं विचारलं, तेव्हा हसत हसत त्यांनी माझ्या दहा एकराची किंमत सांगितली आणि मी खाडकन त्यातून भानावर आलो…
सेलिब्रिटी अजून पण सांगतच होते. टिव्हीवरची बाई देखील एकदम भावुक झाली होती.. माझा पुतण्या तेवढ्यात घरी आला.. मी त्याला सेलिब्रिटीच्या कोरोनाची कहाणी अगदी डोळ्यात पाणी आणून सांगितली….तेव्हा तो म्हणाला, काका, त्यानं बनारस मधून मुंबई गाठली आणि शेकडो कोटी गोळा केले, असेच तुमच्यासारख्या भाबड्या लोकांच्या जीवावर… आता तरी सुधरा… ज्याच्या बंगल्यात गेल्या पाच वर्षापासून चार-चार लाख रुपये महिना पगाराचे दोन डॉक्टर कायम आहेत, बंगल्यातल्या १९ खोल्यांमध्ये चार आयसीयू आहेत.. त्याला पैशाची काहीच कमी नाही, त्यानं घरात उपचार घेण्यापेक्षा हा दवाखाना का गाठला?… पुतण्याच्या या अनपेक्षित बॉम्बने थोडं जाग्यावर आलो… मागं सरकून तोंडाचा चंबू करीत विचारलं..का? तर पुतण्या म्हणाला, काका..अवं ही सगळी नाटकं… त्या दवाखान्याच्या मालकीत या बाबाची भागिदारी आहे म्हणत्यात… त्या दवाखान्यानं मागच्या दहा पंधरा दिवसांत लाखोंनी बिलं करून कोरोनाच्या पेशंटांची लूट केली… मुंबईतल्या लोकांनी तोंडात शेण घालायला सुरवात करताच त्या दवाखान्याची अब्रू वाचवायला हे बापलेक त्या दवाखान्यात गेलेत… कसले डोंबलाचे देव घेऊन बसला, मातीचे पाय आहेत, साऱ्यांचे…! स्वार्थी कुठले.. पुतण्यानं हे सांगताच मी टिव्ही बंद केला.. त्यानंतर पुतण्या म्हणाला, काका, तुम्हाला माहिती झालं का?… वस्तीवरचे तुमचे मित्र रामकाका, त्यांचे भाऊ, दवाखान्यात होते ना? त्यांना बिलापायी जमीन विकल्याचं कळल्यामुळं त्यांना हार्ट अॅटॅक आला…कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांचा मृतदेह इकडे येणार नाहीये, शहरातल्या कोणत्याशा स्मशानभूमीत परस्पर अंत्यसंस्कार होणार आहेत…!!










