संपादकीय
ब्वा माणसा, तुझं आता काही खरं नाही. सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल व्हायला लागलेत, तेव्हापासून एक नवी साखळी तुझ्या गळ्याला करकचून आवळण्यासाठी वाटच पाहते आहे. कोरोनाचा लॉकडाऊन काळ सरत आला. चार-पाच वेळा लॉकडाऊन करूनही कोरोना काही थकत नसल्याने सरकारी खात्यांनी देखील त्यांचे हात टेकले असल्याचे स्पष्ट करायला सुरवात केली आहे. त्याच वेळी आता खरा कोरोना डोके वर काढू लागला आहे, म्हणजे सरकारी दवाखाने, स्पेशल कोरोना रुग्णालये गर्दीने गच्च फुगली असल्याने सरकारला जबरदस्तीने खासगी दवाखानेही शोधावे लागले असून त्यांच्याकडील काही खाटा ताब्यात घेतल्या जात आहेत. अर्थात खासगी दवाखाने फारच तयारीचे आहेत, हे एव्हाना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वांनाच माहिती आहे.
महात्मा फुले जनारोग्य योजनेत देखील हृदयशस्त्रक्रिया मोफत करायचे बंधन असून देखील प्रत्यक्षात भारीतील स्टेंट टाकण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाईकांकडून ५०-६० हजार रुपये उकळले जातात आणि नावाला मोफतची शस्त्रक्रिया पुन्हा गरीबाचे घर कर्जाने उजळून टाकते. हात मोडल्यापासून ते हृदयशस्त्रक्रियेपर्यंत सरकारी योजनांची अवस्था सार्वजनिक न्यासाच्या नोंदणीतील दवाखान्यांनी ऐशीतैशी करून टाकली आहे. अशा स्थितीत आता कोरोनाचे दत्तक पालकत्व खासगी दवाखान्यांकडे जाणार आहे आणि धोका येथेच आहे. सध्या खासगी प्रयोगशाळांनाही कोरोनाच्या चाचण्यांचे अधिकार दिले आहेत, त्या प्रयोगशाळा व सरकारी प्रयोगशाळांमधील तपासण्यांमध्ये वेगवेगळे निष्कर्ष येऊ लागले आहेत, अर्थात ही सुरवात आहे.
कोरोना पेक्षा महाभयंकर असा कोरोनाच्या भीतीचा धंदा आता सुरू होणार आहे. त्यासाठी जसे सरकारी योजनांकरीता दवाखान्यांनी एजंट नेमले होते, तसेच मोठमोठी रॅकेट सक्रिय झाली आहेत. सरकारी दवाखान्यांमध्ये खाट उपलब्ध न होण्याचा एक चक्रव्यूह आता यापुढील काळात सर्वांसमोर उभा राहणार असून त्यातच खासगी दवाखान्यांकडून सामान्यांचे खिसे रिकामे करण्याची योजना आकाराला येईल. काही ठिकाणी त्याची सुरवातही झाली आहे.
तुम्हा साऱ्यांना आठवतंय का? आपण गावाकडच्या दवाखान्यात जातो, तिथे ताप, थंडी आली म्हटले की, डॉक्टर बेडवरती झोपवून टेस्थोस्कोपने आपली छाती तपासतो. न्यूमोनियाचे कोणतेही लक्षण दिसत नसले की, रोगप्रतिकारक औषधाच्या गोळ्या व तापाची तीव्रता कमी करणाऱ्या गोळ्या दिल्या जातात, दोन दिवसांत तापाची तीव्रता कमी होते, मात्र जेव्हा आपण शहरामधील किंवा तालुक्याच्या मोठ्या दवाखान्यांमध्ये जातो, तिथे सर्रास अगोदर हिमोग्राम म्हणजे रक्त तपासणीची मोहिम पार पाडली जाते. आता हिमोग्राम म्हणजे कॉमन बाब बनली आहे. कोणाचेही रक्त तपासलेच जाते. अशी जी कॉमन पध्दत आहे, तीच कोरोनाच्या बाबतीत होणार आहे. हे खरेच होणार आहे. जरी सरकारने २२०० रुपये तपासणीचे दर ठेवले असले तरी आमचे किट अमेरिकेचे आहे, जर्मनीचे आहे अशा नावाखाली हा दर ४ हजार ५०० रुपयेच राहणार आहे आणि यापुढील काळात न्यूमोनियासदृश्य आजारातच नव्हे तर साधा ताप जरी आला तरी कोरोनाचीच चाचणी केली जाऊ शकते.
एक भलीमोठी साखळी राहणार कार्यरत
यासाठी हॉस्पिटल माफियांपासून, बनावट चाचणी प्रयोगशाळा, एवढेच नाही, तर अगदी लॉज, होटेल्स सुध्दा सामील होऊ शकतात. मुंबई सारख्या शहरांमध्ये अशी साखळी तयार होण्यास सुरवातही झाली आहे. एवढेच नाही, तर शाळा सुरू झाल्या तर संस्थांचे प्रमुख, व्यवस्थापनही यात सहभागी होतील.
ही साखळी कशी काम करेल?
१. पहिल्यांदा तुमची रक्ताची तपासणी करेल. त्यानंतर कोरोनाच्याच चाचणीचा आग्रह धरला जाईल. त्यासाठी सर्दी ताप एवढे लक्षण पुरेसे असेल.
२. बहुतेकदा तुमची चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणजे बारामती- पुण्यातील काही उदाहरणे त्यासाठी पुरेशी आहेत. रात्री पॉझिटिव्ह आलेला रुग्ण सकाळी निगेटिव्ह असतो, कारण सरकारी प्रयोगशाळेत त्याचा अहवाल दिवसा तपासलेला असतो, त्यामुळे तो निगेटिव्ह येतो. अशा काही केसेस आतापर्यंत घडलेल्या आहेत. तर तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली की, बस्स, मग सारा खेळ त्यांच्या हातात राहणार. तुमच्या हातात फक्त तुमचे नशीब आणि पैसे!
३. या नंतर तुमच्यासाठी सरकारी दवाखान्यांमध्ये जागा कशी नाही, तिथे किती बेक्कार हाल होतात हे समजावून सांगण्यासाठी खास प्रशिक्षित दवाखान्यांचे एजंट कार्यरत राहतील.
४. मग तुमच्या कोरोनाबाधित अहवालामुळे तुमच्या कुटुंबियांची, संपर्कातील लोकांचीही कोरोना चाचणी करवून घेण्याचा आग्रह होत राहील. मग काहीच दिवसांत कुटुंबातील आणखी दोघा-तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल. मग तुम्ही कोरोनाबाधित असताना घरी कसे जाणार? शिवाय तुम्हाला नंतरच्या काळात क्वारंटाईनही व्हावे लागेल.
५. त्यासाठी काही लॉजेस देखील उपलब्ध असतील. या लॉजेसचे भाडेही किती असेल हे वेगळे सांगायला नको. खास कोविड-१९ साठी असे लॉज कार्यरत राहतील. मग आम्ही देखील शासनाच्या जबरदस्तीने काम करतोय, नाहीतर, आम्ही देखील हे काम केले नसते असे सांगत लॉजवाले तुमची व्यवस्था व्यवस्थित लावतील.
६. मग यातच तुमचे खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंतची वुईथ सॅनिटाईज व्यवस्थाही अंमलात येईल.
हे खोटे वाटतेय ना?…कदाचित असेलही..पण मुंबईसारख्या शहरातील काही गोरखधंदे सरकारच्याच नजरेत भरल्यानंतर सरकारने एक आदेश लागू केला आहे, तो म्हणजे, जरी खासगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला, तरी त्या रुग्णाने सरकारला कळविल्याखेरीज दवाखान्यांमध्ये दाखल होऊ नये. थोडक्यात त्या रुग्णाची सरकारकडूनही तपासणी होणार आहे. एकंदरीत आज स्वप्नवत वाटणारी ही साखळी सध्या कार्यरत झाली आहे आणि येत्या काही दिवसांत एका-एका कुटुंबांचे लाखो रुपये कोरोनाच्या विळख्यात वसूल करण्याची एक राष्ट्रव्यापी यंत्रणाही कार्यान्वित होऊ शकते. अर्थात सैतानांच्या या नगरीत देवदूतांचीही काही कमी नाही. फक्त त्या देवदूतांनी पुढे येऊन जनतेला तू डरायचं नाही, घरातच राहायचं..घरातच उपचार करायचे, डेंगीसारखेच त्याचा सामना करायचा असे सांगावे लागेल..सामान्य लोकांनी देखील कोरोनाची भीती न बाळगता त्यावर खर्चिक उपचार करण्यासाठी आग्रह धरणाऱ्यांपासून स्वतःला रोखावे लागेल. सरकारला देखील असे प्रकार घडू लागल्यास वेळीच कारवाई करावी लागेल, अन्यथा या साखळीत सरकारी यंत्रणाही आहेत, असाच संदेश जाईल.











नेहमीप्रमाणेच अतिशय अभ्यासपूर्ण लेख ाआणि …
सध्याच्या परिस्थितीत सामान्य लाेकांचा ाआत्मविश्वास आणि जगण्याचे बळ वाढवणारी …..