जयमल्हार क्रांती संघटनेची मागणी, दौंड तहसील कार्यालयासमोर निषेध सभा
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील पाटस येथील दोन युवकांची निघृणपणे हत्या करण्यात आली. या हत्याकांडाची सुनावणी हा जलदगती न्यायालयात व्हावी, या हत्येकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या घटनेत सहभागी असलेल्या उर्वरीत आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी जयमल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशध्यक्ष दौलत शितोळे यांनी केली.
दरम्यान, यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले.
पाटस येथील शिवम संतोष शितकल आणि गणेश रमेश माकर या दोन तरूणांची 4 जुलै रोजी क्रुर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध म्हणून आणि उर्वरीत आरोपींना अटक करावी यासह विविध मागण्यासांठी हा मोर्चा आज ( दि.15) दौंड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
तहसील कार्यालयावर हा मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे रूपांतर निषेध सभेत झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करता दौलत शितोळे म्हणाले की, राज्यात रामोशी समाजावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. पाटस येथील दोन निष्पाप तरूणांची क्रूर हत्या केली. ही अंत्यत भयानक आणि दुर्देवी घटना आहे. आमचा वारसा हा आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक आणि बहिर्जी नाईक या क्रांतीकारकांचा आहे. आमचा पोलीसांवर आणि कायद्यावर विश्वास आहे. पोलीस योग्य पध्दतीने तपास करतील अशी आमची खात्री आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॅा.अभिनव देशमुख हे स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस या घटनेतील आरोपींना मोकळे सोडणार नाहीत. चार आरोपी बारा तासाच्या आत पकडले आहेत. मात्र, उर्वरीत आरोपींनाही अटक करावी, तसेच हा गुन्ह्याची सुनावणी हा फास्टटॅग कोर्टात जलदगतीने करावी, या हत्याकांडातील आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, रामोशी समाजावरील अन्यायाच्या घटना लक्षात घेवून त्यांना अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शितोळे यांनी केली.
यावेळी पुणे जिल्हाचे अध्यक्ष नानासाहेब मदने म्हणाले की, यापुढे रामोशी समाजावरचा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, अशा घटना घडल्या तर जशाच तसे उत्तर देवू, मात्र अशा घटना घडू नये याची जबाबदारी पोलीस प्रशासनांची आहे.
वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे म्हणाले की, ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. गुन्हेगारांवर पोलीसांचा धाक राहिला नाही का असा प्रश्न पडतो. पोलीस प्रशासनाने या घटनेतील तपासात हलगर्जीपणा करू नये,. राजकीय दबावाला बळी पडून आरोपींना मदत करू नये.
अनिल माकर यांनी सांगितले की, भर लोकवस्तीत आणि मंदीरासमोर ही हत्या करण्यात आली ही गंभीर बाब आहे. या घटनेतील या हत्येचा सुत्रधार शोधून सर्व आरोपींना अटक करावे, आम्ही त्यांच्या तपासात हस्तक्षेप केला नाही. आरोपी का पकडले नाहीत याचा जाबही विचारला नाही, आम्ही कायदा मानतो.
जयमल्हार क्रांती संघटनेच्या महिलाअध्यक्षा सुजाता जाधव, महाराष्ट्र वडार संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, तृप्ती भंडलकर, रामदास खोमणे आदींने मनोगत व्यक्त केली. दरम्यान, यावेळी संघटनेच्या पदाधिकारांनी तहसीलदार संजय पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी तहसीलदार संजय पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांना हे निवदेन पाठवून मागण्यांसंदर्भात चर्चा करून न्याय मिळण्यासाठी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
दौंड तालुक्यासह बारामती, फलटण, सातारा, शिरूर, इंदापुर, कोल्हापुर आदी भागातून अनेक पदाधिकारी आणि कार्येकर्ते सहभागी झाले होते. घटनेचे गांर्भाय लक्षात घेवून दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात केला होता. पाटस येथे सकाळ पासूनच पोलीसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त होता.