इंदापूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र विधानसभेतील 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत महाविकास आघाडी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तात्काळ 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार पी.बी.वायकर यांना दिले.
निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून पहिल्याच दिवशी लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केलेले आहे. या अधिवेशनात जनतेच्या अनेक विषयांवर चर्चा होवून निर्णय होणे अपेक्षित होते त्यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी राजकिय आरक्षण सरकारच्या विविध खात्यांमधील घोटाळयात मंत्र्यांचे सहभाग, शेतक-यांच्या शेती संदर्भात विविध प्रश्न, शैक्षणिक प्रवेशाबाबत अनिश्चित धोरण याचबरोबरीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची वाढीव वीज बिल इत्यादी प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित होते.
यासाठी खरेतर अधिवेशनाचा कालावधी मोठा हवा होता परंतु या सरकारने पळपुटेपणा करत कोरोनाचा बाहाणा करून केवळ दोन दिवसाचे अधिवेशन ठेवले आहे. महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांना विविध विषयांवर बोलू दिले नाही वास्तविक लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सभागृहात उपस्थित करणे चुकीचे नाही, तर तो संविधानीक हक्क आहे.
असे असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी त्यांचे कुठलेही मत ऐकून न घेता विधानसभेचे कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला व लोकशाही परंपरा मोडीत काढत जनतेच्या प्रश्नांचा गळा घोटला आहे. याबाबतीत भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी विधानसभेचे तालिका अध्यक्ष यांचेकडे विचारणा केली असता तालिका अध्यक्ष यांनी कुठलीही दखल न घेता जनभावनेचा अपमान केलेला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी केवळ या कृत्याचा जाब विचारला कसल्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नसताना देखील अध्यक्षांनी खोटी माहिती जनतेपुढे व प्रसार माध्यमांपुढे सादर करत भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबित केलेले आहे ही कृती बेकायदेशीर असून असंविधानिक आहे. तसेच हुकुमशाही प्रवृत्तीची व घटना विरोधी आहे भाजपा सदस्यांची संख्या कमी करून सरकार वाचविण्याचा हा खटाटोप चालू आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बेजबाबदार व कुचकामी सरकार ठोकशाहीच्या बळावर सर्व संकेतांची पायमल्ली करत आहे.अशा या सरकारचा भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका जाहिर निषेध व धिक्कार करीत आहे.
यावेळी इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, मारूती वणवे, शहराध्यक्ष शकिल सय्यद, भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे, राजकुमार जठार, शशिकांत जाधव, महेंद्र रेडके, प्रशांत उंबरे, सचिन सावंत, सागर आरगडे, संतोष कदम, दिनानाथ मारणे, संतोष कांबळे, तेजस देवकाते, हनुमंत निंबाळकर, मल्हारी गायकवाड, सुयोग सावंत आदी उपस्थित होते.











