राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील रासायनिक कंपन्यांचे रसायनयुक्त दुषीत सांडपाणी पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात ओढयात सोडण्याचा प्रकार सातत्याने पहावयास मिळत आहे. आज मंगळवारी (दि. 1 ) पुन्हा एकदा कंपन्यांनी पावसाच्या पाण्यात दुषीत रासायनिक सांडपाणी पावसाच्या पाण्यात ओढयाद्वारे सोडण्याची संधी सोडली नाही.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक वर पाहू शकता
परिणामी हे दुषीत सांडपाणी चक्क पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर आल्याने याठिकाणी तलावात जसे पाणी साचते तसे महामार्गावर पाण्याचे मोठे डबके साचले असल्याची परिस्थीती पहावयास मिळाली. दरम्यान, सकाळी नऊ वाजेपर्यंत याठिकाणी कोणतीही जबाबदार शासकीय यंत्रणा पोहचली नव्हती…
तालुक्यातील कुरकुंभ औद्योगीक वसाहती मधील रासायनिक कंपन्या सध्या स्थानिक नागरीकांच्या जीवावर उठल्या आहेत. मागील काही दिवसापासून कंपन्यांना लागणारी आगीच्या घटना आणि त्यात आता रासायनिक दुषीत सांडपाणी रस्त्यावरच सोडण्याच्या प्रकारामुळे नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कंपन्यामधील हवेचे प्रदुषण आणि रासायनिक दुषीत सांडपाणी सोडलेले जलप्रदुषण यात स्थानिक नागरीकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऎरणीवर आला आहे.
आज मंगळवारी (दि.1 ) या औद्योगीक वसाहतीमधील काही कंपन्यांनी रसायनयुक्त दुषीत सांडपाणी रात्रीच्या सुमारास ओढ्यात सोडले. परिणामी महामार्गावर या ओढ्यातील पाणी तुंबल्याने या पाण्याचा मोठा प्रवाह ओढ्यातून थेट पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर आला. त्यामुळे या परिसरात सांडपाण्याचे मोठे डबके साचले. या डबक्यात प्लास्टिक व कागदी पिशव्या साचल्या आहेत. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. आज पहाटे पुणे सोलापुर महामार्गावर प्रवास करणारे एक चारचाकी वाहन पाटस बाजूकडून सोलापुर बाजुकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती जागेवर वळाली आणि पाण्यात जावून अडकली.
या अपघातात वाहनचालक व एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. अनेक दुचाकी चालक या पाण्यात अडकून किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. मात्र याठिकाणी सुदैवाने अद्यापतरी मोठी दुर्घटना घडली नाही.
सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प फक्त नावालाच…
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याच्या सांडपाणी हे शुद्धीकरण करून प्रक्रीया करण्याचे बंधन आहे. मात्र या शुध्दीकरण प्रकल्पात दुषीत सांडपाणी हे शुध्दीकरण करून सोडण्याची प्रक्रीयाही केली जात नसल्याचे उघड झाले आहे. पावसाळ्यात थेट ओढयाच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत.
आता तर कोणतीही प्रक्रिया न करता शुध्दीकरण प्रक्रीया केंद्राजवळील नाल्यामधून थेट रसायनयुक्त दुषीत सांडपाणी रस्त्यावरच सोडण्याचा प्रकार या कंपन्यांनी केला आहे.
प्रदुषण विभागाचे अधिकारी करतात काय?
पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुरकुंभ औद्योगीक वसाहतीमधील कंपन्यावर कोणतेच नियंत्रण नाही. याठिकाणी हवेचे आणि जलप्रदुषण मोठ्या प्रमाणावर होत असताना ही ठोस अशी कारवाई या कंपन्यावर आतापर्यंत केली गेली नाही. या अधिकाऱ्यांना कंपन्या पैसे देत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक करीत आहेत.
दरम्यान, याबाबत सरपंच राहुल भोसले म्हणाले, मागील तीस वर्षापासून आम्ही या प्रदुर्षणाचा त्रास सहन करत आहोत. ग्रामपंचायतीच्य़ा वतीने औद्योगिक वसाहत, पुणे प्रदुषण नियंत्रण विभाग, तसेच खासदार,आमदार, उद्योगमंत्री यांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. या कंपन्याना काही फरत पडत नाही. कंपन्यातील आगीमध्ये किती जणांचा मृत्यु झाला याचीही नोंद नाही. नागरीक सुरक्षित नाहीत. आता हे सांडपाणी कुरकुंभ गावात येवू लागले आहे. या दुषीत सांडपाण्यामुळे विहीरी व बोअरमधील पाणी साठा दुषीत झाला आहे. पाण्याचे सर्व स्त्रोत दुषीत झाले आहेत. याबाबत मागील अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने तक्रारी करीत आहोत.











