इंदापूर : महान्यूज लाईव्ह
खासदार राजीव सातव हे देशातील राजकारणाची अतिशय चांगली जाण असणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. सतत नावीन्यपूर्ण शिकण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांची प्रारंभापासूनची राजकीय कारकिर्द मी जवळून पहिली आहे. सामाजिक जाण असलेले सुसंस्कृत असे हे नेतृत्व आज हरपले अशा शब्दात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
विधिमंडळामध्ये आमदार म्हणून राजीव सातव यांची कामगिरी कौतुकास्पद होती. जनतेचे प्रश्न ते विधानसभेत पोटतिडकीने मांडत. त्यानंतर खासदार म्हणूनही त्यांनी संसदेत अनेक वेळा अभ्यासू भाषणे केली. त्यामुळे त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. देशातील राजकारणाची अतिशय चांगली जाण असणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
राजीव सातव यांचा स्वभाव संयमी, मितभाषी असा होता. ते पुण्यात उपचार घेत असताना आजारातून निश्चितपणे बरे होतील असा विश्वास वाटत होता. पुत्र राजीवच्या अचानकपणे सोडून जाण्याने मातोश्री माजी मंत्री रजनी सातव यांना बसलेला हा प्रचंड धक्का सहन करण्याची ताकद ईश्वराने त्यांना द्यावी अशी प्रार्थना हर्षवर्धन पाटील यांनी केली.











