विशाल कदम :- महान्यूज लाईव्ह
लोणी काळभोर : दारुच्या नशेत पेटवून घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याचा घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत उघडकीस आली आहे. विवेक पेतराज पंडीत (वय. ३६, रा.लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक पंडीत हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता. मागील तीन दिवसांपासून त्याच्या खोलीचा आतून दरवाजा बंद होता. विवेकचा दोन-तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्यामुळे त्याच्या खोलीतून दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला होता.
स्थानिक नागरिकांनी ही माहिती समाजसेवा करण्यात अग्रेसर असलेले राम शिग्री यांनी दिली. शिग्री यांनी ही माहिती त्वरित लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता, त्यांना विवेक यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. पोलिसांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना विवेक पंडित हा भाजलेल्या अवस्थेत पाण्याच्या बॅरलमध्ये पडलेला असल्याचे आढळून आले.
विवेक हा घरात एकटाच राहत असल्यामुळे या घटनेची कुणालाच लवकर माहिती मिळाली नाही. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खोलीच्या दरवाजाला आतून कडी लावून भरपूर मद्य प्राशन केले होते. नशेत त्याने पेटवून घेतल्यावर त्याला आगीचे चटके असह्य झाले. त्याने खोलीतील पाण्याने भरलेल्या बॅरलमध्ये उडी मारली. बॅरल मधील पाण्यामुळे आग विझली. परंतु, दारुच्या नशेत असल्याने त्याला बाहेर यायचे समजले नाही. त्यामुळे तो बॅरलमध्येच मरण पावला. विविकने दोन दिवसांपूर्वी दारुच्या नशेत पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विवेक याच्या आत्महत्येला बराच कालावधी झाल्यामुळे त्याचे शरीर खूपच फुगले होते. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्याचे शरीर फुगल्याने बॅरलच्या बाहेर मृतदेह काढता येत नव्हता. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मतदेह तेथून तातडीने हलवणे गरजेचे होते. पोलिसांनी हॅक सॉ ब्लेडच्या सहाय्याने तो बॅरल कापला. आणि पंचनामा करून विवेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी आपले कर्त्यव्य चोख बजावल्यामुळे पोलिसांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.











