खंडाळा : महान्यूज लाईव्ह
कवठे (ता. खंडाळा) याठिकाणी जेवणाकरिता झोपडीमध्ये बसलेल्या वीज पडल्याने शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५ ,रा झगलवाडी ता.खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय ६०,रा. कवठे ता.खंडाळा) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कवठे गावच्या हद्दीमध्ये वेताळाचा माळ नावाचे शिवारामध्ये झगलवाडी ता. खंडाळा येथील शशिकांत लिमन यांचे मालकीची शेतजमीन असून हि जमीन सध्या वाट्याने कवठे येथील खाशाबा जाधव यांनी कसायला घेतली आहे.
रविवार (दि.०२ मे) ११ वाजण्याच्या दरम्यान शशिकांत लिमन, खाशाबा जाधव हे भुईमूगाच्या पिकाला पाणी देण्याचे काम करीत होते. यावेळी पाणी देण्याचे काम झाल्यानंतर दुपारी १ वाजता शेतामधील कोपीमध्ये शशिकांत लिमन व खाशाबा जाधव हे जेवणाकरीता बसले होते. यावेळी अचानकपणे वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु झाला. यावेळी १.३० वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे विजांचा लोळ जेवणाकरिता बसलेल्या शशिकांत लिमन व खाशाबा जाधव यांच्या कोपीवर पडला.
यावेळी झोपडीकडे खाशाबा जाधव यांची पत्नी, मुलगा व प्रशांत जाधव त्यांची पत्नी, आईने धाव घेतली असता, शशिकांत लिमन व खाशाबा जाधव हे झोपडीमध्ये जागीच मृत झाले होते. शशिकांत लिमन व खाशाबा जाधव यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे झगलवाडीसह कवठे गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची खबर विठ्ठल तुकाराम भोसले यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस हवालदार विनोद पवार हे करीत आहे.











