माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – जिल्ह्याच्या विविध अवकाळी पावसाने विजेच्या कडकडाटसह जोरदार हजेरी लावली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर ( चेलाडी फाटा ) येथे वीज अंगावर वीज कोसळून आदिवासी कातकरी समाजातील दोन लहान मुली जागीच ठार झाल्या आहेत. तर एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. वीज कोसळून दोन मुली जागीच ठार झाल्याने पाऊस जीवावर उठला असल्याची भावना उमटत आहे
सीमा अरुण हिलम, वय ११, अनिता सिंकडर मोरे वय ९ दोघीही रा. नसरापूर चेलाडी फाटा ( ता. भोर ) असे वीज कोसळून दुर्दैवी घटनेत ठार झालेल्या शाळकरी मुलींची नावे असून येथील चांदणी प्रकाश जाधव वय ९ असे बचावलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास राहत असलेल्या घराशेजारील डोंगर पायथ्या लगत दुर्दैवी घटना घडली.
यामुळे येथील आदिवासी समाजावर मोठी शोककळा पसरली असल्याने अनेकांचे मन गहिवरले होते. चेलाडी फाटा येथे आदिवासी समाजातील मासेमारी करणाऱ्या कुटुंबांची लोकवस्ती येथे आहे. येथील एकाच वर्गात शिकत असलेल्या तीन बालमैत्रीणी घराशेजारील डोंगर पायथ्यालगत असलेल्या एका मोठ्या दगडाजवळ खेळत असताना अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला.
यावेळी मुलींच्या घरातील कुटुंबीयांनी त्यांना घरी या असा आवाज दिला, मात्र अवघ्या काही अंतरावर असतानाच मोठा आवाज होऊन वीज कोसळल्याने दोन मुली गंभीर भाजून दगडापासून लांब फेकल्या गेल्या. यात सीमा आणि अनिता ठार झाल्या. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मुलींना नसरापूर येथील सिद्धविनायक रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वी दोन मुली ठार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच नसरापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव जाऊन शोकाकुल कुटुंबांना आधार देत पुढील कार्य वाहीसाठी तजवीज केली. राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसारे, उपनिरीक्षक राहुल साबळे महसूल विभागाचे श्रीनिवास कंद्देपल्ली, तलाठी जे. डी. बरकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव आणि भोरचे तहसिलदार अजित पाटील यांनी दुःख व्यक्त करत आपत्ती घटनेत मृत झालेल्या मुलीच्या कुटुंबांना तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.











