सखे सोबती : शिवाजीआण्णा भोसले (वाणेवाडी, ता. बारामती)
शिवाजीआण्णा भोसले हे तसं आडदांड व्यक्तिमत्व. मनात असेल ते समोरासमोर बोलण्याची धमक असलेला. मनात असेल तसे वागण्याची आणि त्याचे परिणाम निर्भीडपणे भोगण्याची तयारी असलेला. पण बैठक समाजपरिवर्तन करू इच्छिणार्या कार्यकर्त्याची. पुण्यात शाळेत शिकत असताना आवर्जून राजकीय सभा ऐकायला जात. ना. ग. गोरे, एस. एम. जोशी यांची भाषणे त्यावेळी त्यांनी ऐकलेली. त्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे सोमेश्वरजवळील वाणेवाडीत आले. पवारसाहेबांनी बारामती तालुक्यात युवक काँग्रेसची पक्षबांधणी करताना जे कार्यकर्ते जोडून घेतले, त्यामध्ये प्रमुख नाव शिवाजीआण्णांचे. यातच ६२ सालाच्या सुमारास शरद पवार वाणेवाडीत आले असताना त्यांची भेट झाली. युवक काँग्रेसचे काम करण्याबाबत शरद पवारांनी त्यांना विचारले. तेव्हापासून शरद पवारांशी दोस्ती झाली. जवळ जवळ एकाच वयाचे असल्याने आण्णा शरद पवारांना नावानेच हाक मारत. एका मोटारसायकलवरून फिरत असत. अनेकदा एसटीनेही एकत्र प्रवास करीत. शरद पवार मंत्री झाल्यावर त्यांनी साहेब नावाने बोलावायला सुरुवात केली.
पवार कुटुंबाशी मैत्री
शिवाजीआण्णांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवारांपेक्षाही जास्त वाटा राहिला तो शारदाबाई पवारांचा. शरद पवारांच्या आईंचा. विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीत शारदाबाई प्रचारासाठी येत. काकडे गटाच्या वर्चस्वाखालील या परिसरात प्रचारासाठी स्थानिक लोक पुढे येत नसत. त्यावेळी शारदाबाई आण्णांबरोबर गावागावात फिरल्या आहेत. शिवाजीआण्णा ७२ साली जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरही अनेकदा आठवडा-पंधरा दिवसांतून शारदाबाई आण्णांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या गावांना भेटी देत असत. तेथील प्रमुख कार्यकर्त्यांशी ओळखी करून देत. कोण कसा आहे, कुणाशी कसे वागायचे याच्या कानगोष्टी सांगत. माणसे पारखण्याचे जे कसब शरद पवारांमध्ये आहे ते मूळ असे शारदाबाईंकडून आलेले आहे. पवारसाहेबांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांच्याशीही शिवाजीआण्णांची मैत्री होती. अकलूजच्या कारखान्यावर एमडी म्हणून आप्पासाहेब काम करीत होते तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट शिवाजीआण्णांनी जवळून पाहिलेले होते. यामुळेच शिवाजीआण्णांच्या मुलीच्या लग्नात आप्पासाहेब त्यांच्यासोबत दोनतीन तास पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते.
यशवंतरावांचे शरद पवारांकडे लक्ष जायला कारणीभूत ठरलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे शरद पवारांचे वकील असलेले मोठे बंधू वसंतराव पवार. काँग्रेसचे बारामतीचे खासदार केशवराव जेधे यांच्या मृत्यूमुळे या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. केशवरावांचे बंधू गुलाबराव जेधे काँग्रेसतर्फे उभे राहिले. शेकापतर्फे वसंतराव पवार उभे होते. या निवडणुकीत वसंतराव पवारांनी काँग्रेस उमेदवाराच्या नाकीनऊ आणले. काँग्रेसच्या प्रचारासाठी स्वत: यशवंतरावांना या मतदारसंघात अनेक सभा घ्याव्या लागल्या. त्यावेळेस पवारांच्या घराकडे, विशेषत: शरद पवारांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले असावे.
मिसरूडपण फुटले नाही आणि म्हणे शरदला निवडून देणार
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक ६७ ची विधानसभा निवडणूक. शरद पवारांना तिकीट देऊ नये यासाठी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील मातब्बर मंडळी यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेली होती. तिकीट शरद पवारांनाच द्या, असे सांगण्यासाठी जे लोक यशवंतराव चव्हाणांकडे गेले त्यात शिवाजीआण्णा होते. बहुतेक सगळे तरुण लोक. यशवंतराव शिवाजीआण्णांकडे पाहून म्हणाले, अरे, तुला अजून मिसरूड फुटले नाही, तू काय शरदला निवडून आणणार? त्यावेळी शिवाजीआण्णा आत्मविश्वासाने म्हणाले होते, तिकीट द्या, १०१ टक्के निवडून आणणार. त्यानंतर शरद पवारांचे तिकीट नक्की झाले. त्यावेळीही शरद पवारांना शंका वाटत होती की काकडे गटाचे वर्चस्व असलेल्या निंबूत, वाणेवाडी, मुरूम या गावांतून आपल्याला मते मिळतील की नाही. त्यांनी शिवाजीआण्णांना सांगितले होते की या गटातून माझ्यामध्ये व विरोधी उमेदवारात १००० ते १५०० पेक्षा जास्त फरक राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. हा फरक मी इतर भागातून भरून काढतो. शरद पवारांचे या भागात कार्यकर्ते मोजकेचे होते, पण जिवाला जीव देणारे होते. त्यांनी या परिसरातून १६०० पेक्षा जास्त लीड मिळवून दिले. असाच एकदा ७९ सालच्या पंचायत समिती निवडणुकीत पवारसाहेबांच्या शब्दाखातर शिवाजीआण्णांनी भरलेला फॉर्म माघारी घेतला आहे.
रुसवा आणि दिलजमाई
राजकीय परिवर्तन झाले तरी सहकारातील संघर्ष सुरूच राहिला. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना काकडे गटाच्या ताब्यात होता. शिवाजीआण्णांनी ८१ सालात पवारसाहेबांच्या सल्ल्याने मुगुटराव काकडे यांच्याबरोबर एकत्रित पॅनल करून निवडणूक लढविण्याचे ठरविले. निवडणुकीसाठी फॉर्मही भरले. ज्यादिवशी छाननी झाली, त्याच रात्री मुकुटराव काकडेंचे निधन झाले. हा खूपच मोठा धक्का होता. या परिस्थितीत निवडणूक लढवावी की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले. शिवाजीआण्णांचा स्वभाव पुढे टाकलेले पाऊल मागे घेण्याचा नव्हताच. त्यांनी निवडणूक लढविण्याचे ठरवले. या निवडणुकीत त्यांना शरद पवारांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे ते शरद पवारांवर रागावले. पुढची दोन वर्षे ते शरद पवारांना भेटलेही नाहीत. मात्र शरद पवारांनी त्यांना कधीच परके मानले नाही. जिथे संधी मिळाली तिथे त्यांना समजावण्याचा, पुन्हा आपलेसे करून घेण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. शिवाजीआण्णांच्या घरातील एका लग्नाची पत्रिका त्यांना पोस्टाने पाठवण्यात आली. त्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले. त्यानंतरही शिवाजीआण्णांचा राग गेला नव्हता. अखेरीस चंद्ररावआण्णांनी वेगळे कारण सांगून शिवाजीआण्णांना सांगवीतील त्यांच्या घरी बोलावले. पवारसाहेबही तिथे आले. शिवाजीआण्णांची समजूत काढली. पुन्हा ९२ सालातील सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवाजीआण्णांनी काम केले. शरद पवारांसाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता लाखमोलाचा होता.
वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात राहण्याची पवारसाहेबांची पद्धत आहे. राज्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या आगामी १० दिवसांच्या कार्यक्रमांची माहिती महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना टपालाने पाठविली जात असे. तो काळ आजच्यासारखा संपर्कसाधनांच्या मुबलकतेचा नव्हता; परंतु या पत्रांमुळे पवारसाहेब आज नेमके कोठे आहेत हे सर्व कार्यकर्त्यांना माहीत असे. कार्यकर्त्यांनी पाठविलेल्या प्रत्येक पत्राला असेच टपालाने उत्तर येत असे. कोणत्याही संस्थेत नोकरभरती करतानाही या पद्धतीने सर्वांना विश्वासात घेतले जाई. सर्व समाजातील, सर्व विभागातील मुलांना न्याय मिळेल याची विशेष काळजी घेतली जाई.
चिठ्ठीवर उमेदवारी
पंचायत समितीच्या ७२ सालच्या निवडणुकीसाठी तिकीट वाटप चालू होते. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बसवून, चर्चा करून निर्णय घेतले जात होते. एका मतदारसंघात मात्र घोडे अडले. त्रिंबक खलाटे व धोंडीराम खलाटे हे दोन्ही मातब्बर उमेदवार होते. कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर दोघांच्या संमतीने चिठ्ठी टाकण्यात आली. त्यात त्र्यंबक खलाटेंचे नाव निघाले. त्यांना तिकीट देण्यात आले. धोंडीराम खलाटेंनी त्यांचा प्रचार विनातक्रार केला. याच निवडणुकीत काही गावच्या ग्रामपंचायत सदस्यांना विरोधकांनी परजिल्ह्यात नेऊन ठेवले. त्यावेळी पंचायत समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य मतदान करीत असत. अनेक प्रयत्न करूनही या सदस्यांना परत आणता आले नाही. मतदानादिवशी मत देण्यासाठी हे सदस्य प्रतिस्पर्धी गटाच्या पहार्यात आले. या सगळ्यांसमोर शिवाजीआण्णा या सर्व सदस्यांकडे गेले. मोठ्या आवाजात त्यांना सांगितले, कुणाला घाबरण्याचे कारण नाही, तुम्हाला योग्य वाटेल त्याला मतदान करा.फफ त्या कणखर स्वभावाचा फायदा हा झाला की त्या निवडणुकीत पवार गटाचा उमेदवार निवडून आला.
आज शिवाजीआण्णांकडे कोणतेही पद नाही. पण स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आजही कायम आहे. आजही सहकारी कारखानदारीत काही चुकीचे वाटले तर जाहीरपणे सांगायला ते कचरत नाहीत. त्यांच्या बोलण्याची दखल घ्यावीच लागते, इतका त्यांचा धाक आहे.
संकलन : घनश्याम केळकर, बारामती मो. 9881098138










