सर्वांच्या सहकार्याने कोरोनाची साखळी तोडायची आहे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन
- घाबरू नका,मात्र काळजी घ्या..
- वारंवार घराबाहेर पडू नका..
- उद्योजकांनी कामगारांची सोय तेथेच करावी.
पुणे : महान्यूज लाईव्ह
सध्या आपण मोठ्या प्रमाणात टेस्ट करीत आहोत,त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.घाबरून जाण्याचे कारण नाही,परंतु काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंबविले आहे.अशा प्रसंगी आपण सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
वाढती रुग्ण संख्या बघून घाबरू नका.यावर आपण निश्चित मात करू,असा विश्वास व्यक्त करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले,पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे.ही चिंतेची बाब आहे.त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका.पुण्यासाठी हा कठीण काळ आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या.वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका. सर्दी,ताप,खोकला,थकावट व भूक लागत नसेल तर तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू हाॕस्पिटलमध्ये जाऊन डाॕक्टरांना दाखवा. आजार अंगावर काढू नका किंवा लपून ठेऊ नका.वेळेवर उपचार मिळाले,तर रुग्ण बरे होतात,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.भाजीपाला देखील कांही दिवस नागरिकांना मिळणार नाही. तसेच उद्योजकांनी कामगारांची व्यवस्था तेथेच करावी.त्यांना अजिबात बाहेर जाता येणार नाही.त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले,शेतकऱ्यांनी सुध्दा काळजीपूर्वक शेतीची कामे करावीत. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण झाली.बिनधास्त राहू नका.काळजी घ्या,असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.










