- शरद पवार यांनी घेतला सामन्याचा आनंद
बारामती : महान्यूज लाईव्ह राजकीय पंढरी म्हणून ओळख असलेल्या बारामतीला आता नवी ओळख मिळाली आहे. आजपासून बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत रणजी क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात देखील रणजी क्रिकेटचे सामने होऊ लागले आहेत याचा आनंद आहे, या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
शरद पवार यांची बारामती म्हणून सर्वत्र ओळखली जाते. त्याचबरोबर राजकारणातलं महत्वाचं शहर म्हणून बारामतीकडे पाहिले जाते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मैदानावर बुधवारपासून रणजी क्रिकेट सामन्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात बारामतीला क्रिकेटची नगरी म्हणूनही ओळख मिळणार आहे.
बारामतीमध्ये आज सुरू झालेल्या पहिल्या महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या रणजी क्रिकेट सामन्याचे अनौपचारिक उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी प्रत्येक खेळाडूंशी संवांद साधला. यावेळी सर्व क्रिकेटपटूंसोबत फोटोसेशनही करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी संपूर्ण सामन्याचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रतिभाताई पवार, विठ्ठल मणियार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
ग्रामीण भागात देखील रणजी क्रिकेट सामना होतो आहे, क्रिकेट सामन्याचा आनंद घेण्यास सोबतच ग्रामीण भागातून देखील चांगले क्रिकेटपटू तयार होतील, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. बीसीसीआय , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसेच बारामती नगर परिषद यांचेही शरद पवार यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले . बारामतीची निवड बीसीसीआय व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने केली, याचा विशेष आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले .










