राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना पेढा भरून मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. त्यांचा हा पेढा भरवण्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून गावात हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र ह्यापूर्वी इतर निवडणुकांमध्ये एकमेकांवर टीका टिपणी करणारे कुल – थोरात यांचा हा गोडवा लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकापर्यंत ही कायम राहणार का ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले खरे, पण विधानसभेला दिलजमाई होणार का ? असे अनेक तर्क वितर्क केले जात आहेत. बारामती लोकसभा निवडणुक मतदानाची प्रक्रिया जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या पक्षातील एकमेकांवरील होणारे आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात ही परिस्थिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिल्लीत पाठवण्यासाठी रात्रीचा दिवस एक केला आहे. त्यासाठी त्यांनी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे या कट्टर विरोधकांना आपल्या बाजूला खेचण्यास राजकीय खेळी यशस्वी झाली आहे. तशीच खेळी त्यांनी दौंडमध्ये भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात त्यांना एकत्र आणून सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवले आहे.
आमदार कुल आणि थोरात एकत्र आल्याने दोन्ही गटातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मात्र स्वागत केले आहे. खरंतर हे दोघेही यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना एकत्रच होते. अजित पवार यांनी यापूर्वीच कुल – थोरात यांना एकत्र आणणे गरजेचे होते. मात्र लोकसभेच्या निमित्ताने का होईना, हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्याने दौंडच्या विकासाला गती येईल अशी अपेक्षा या ज्येष्ठ कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांना पेढा भरवत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात हेही उपस्थित होते. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दौंड तालुक्यात हे मात्तबर राजकीय विरोधक एकत्र आल्याने तालुक्यात राजकीय शांतता राहील आणि एकमेकांचे शत्रुत्व संपुष्टात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
सध्या तरी तालुक्यात हे स्थिर राजकीय चित्र निर्माण झाले आहे. मात्र दुसरीकडे आमदार कुल आणि थोरात यांच्या राजकीय सत्तासंघर्षात अनेक कार्यकर्त्यांचा नाहक बळी मात्र घेतला आहे. तालुक्यातील गावागावात वाड्यावर वस्त्यांवर कुल – थोरात या दोघांना मानणारा निष्ठावंत वर्ग आहे. आपल्या नेत्यांसाठी कोणत्याही आणि काही करायला तयार असणारे हे कार्यकर्ते दोघांकडे पण आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये हेच कार्यकर्ते गावागावात एकमेकांच्या विरोधात भिडले. त्यांच्यावर राजकीय द्वेषातून खोटे गुन्हे ही दाखल झाले. परिणामी अनेक कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य तर उध्वस्त झालेच, मात्र काहींना आजही कोर्ट कचऱ्यात हेलपाटे मारावे लागत आहेत.
मानसिक त्रास आणि आर्थिक त्रासही अनेकांना सहन करावा लागला. या दोघांच्या राजकीय सत्ता संघर्षात सर्वात जास्त त्रास आणि नुकसान झाले असेल, ते माजी आमदार थोरात यांच्या कार्यकर्त्यांचे. दौंड तालुका मध्ये सर्वात जास्त काळ सत्तेची सूत्रे ही कुल घराण्याकडे राहिली. रमेश थोरात यांच्याकडे फक्त पाच वर्षेच आमदारकी राहिली. तरीही त्या पाच वर्षात थोरात अनेक कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकले नाहीत अशी खंत गावागावातील अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
आपल्या मुलाच्या पुढील राजकीय भवितव्यासाठी रमेश थोरात यांनी राजकीय तडजोड केल्याची चर्चा तालुक्यात आहे. सध्या आमदार कुल आणि थोरात हे जरी एकत्र आले, तरी त्यात मोठे नुकसान हे रमेश थोरात यांचे झाल्याचे चित्र आहे. आमदार कुल यांच्यामागे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. आमदार कुल हे ज्या पक्षात जातील त्या पक्षात कार्यकर्ते ही जातात. कुल यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक वेळी पाठबळ दिले आहे. अनेक कार्यकर्त्यांना कामे दिली आहेत. त्यामुळे कुल हे राष्ट्रवादीत होते, तेव्हाही आणि रासपमध्ये गेले तेव्हाही!
आता ते भाजपमध्ये आहेत, तरीही कुल ह्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मजबूत फळी कायम उभी राहिली आहे. उलट थोरात यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार कुल गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे काही कार्यकर्ते परिस्थिती बघून या गटात त्या गटात उड्या मारल्याचे चित्र आहे. सध्या लोकसभेच्या निमित्ताने कुल – थोरात एकत्र काम करत असले, तरीही लोकसभेनंतर हे दोघे कायम एकत्र काम करतील ह्याची शाश्वती नाही. दौंड विधानसभेची जागेवर सध्या तरी भाजपचा हक्क आहे, मात्र लोकसभेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दौंड मध्ये मतांची आघाडी मिळाली तर अजित पवार हे दौंड विधानसभेच्या जागेवर दावा करू शकतात.
तसे झाले तर ते आमदार कुल यांच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे सध्या एकमेकांना पेढा भरून मनसोक्त गप्पा मारणारे कुल – थोरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतरही एकत्र येऊन मनशोक्त गप्पा मारणार का? एकत्र येऊन दौंडचा विकास करणार का? त्यांची ही राजकीय मैत्री टिकेल का? हे पहावे लागणार आहे.











