स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित नुकत्याच देशभरात झळकलेल्या छावा चित्रपटासंदर्भात एक बातमी. तिकडे छावा चित्रपट प्रचंड गर्दीत, प्रेक्षकांच्या उत्साहात सुरू असतानाच दुसरीकडे या चित्रपटात राजेश शिर्के यांच्या पूर्वजांची आणि परिवाराची बदनामी केल्याचा आरोप शिर्के घराण्याच्या वतीने दीपक राजेश शिर्के यांनी केला आहे.
दरम्यान या संदर्भात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि निर्मात्यांना देखील आम्ही नोटीस पाठवणार असून गुन्हे दाखल करणार आहोत. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गोंधळ नको म्हणून आम्ही गप्प बसलो, पण राजे शिर्के परिवाराची होणारे बदनामी टाळायची असेल, तर तसेच खोटे सीन वगळावेत, नाहीतर आम्ही शंभर कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू असा इशारा शिर्के परिवाराने दिला आहे.
राजेशिर्के घराण्याचे अजूनही छत्रपती घराण्याची चांगले संबंध असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाला राजेशिर्के यांची मुलगी दिली. त्यानंतर आतापर्यंत छत्रपती घराण्याशी तेरावेळा सोयरीक झाल्याची आठवण दीपक राजेशिर्के यांनी करून दिली.
वतनदारीचाच मुद्दा घ्यायचा असेल तर शिर्के घराणे हे छत्रपती शिवराय संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षांपासून राजे होते. रायगड सुद्धा शिर्केंकडे 300 वर्ष होता. कोकण आणि मुंबईच्या भागाला पूर्वी शिरकाण असं म्हटलं जायचं. हा भाग स्वराज्यात विलीन करण्यासाठी शिर्के घराण्यानेच विश्वासाने छत्रपती कडे दिला होता.
गद्दारी कोणी केली हे इतिहासाच्या संशोधकांनी शोधून काढावं, पण राजेशिर्केंची बदनामी करू नये. छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली ज्याला दिले, त्याच्याच नातवाने 122 वर्षांनी बखर लिहीलेली आहे. त्याच्या डोक्यात द्वेष नसेल का? आम्ही फक्त लढाईचं काम केलं असे दीपक राजेशिर्के म्हणाले. छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्य लवकरात लवकर वगळावेत अन्यथा अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरे जावे असा इशारा त्यांनी दिला आहे.











