आप्पासाहेब खेडकर : महान्युज लाईव्ह
खाजगी भांडवलदार एकत्र आले की, शेतकऱ्यांची गळचेपी होते, व्यापारी राजा झाला की, जनता भिकारी होते या म्हणी काही उगीच तयार झालेल्या नाहीत. म्हणूनच तर खाजगी साखर कारखान्यांच्या गळचेपी विरोधात महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीची चळवळ सुरू झाली, आता पुन्हा एकदा भांडवलशाहीचा वरवंटा शेतकऱ्यांच्या शेतावर फिरू लागला आहे..
विशेषतः दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना तर याचा चांगलाच अंदाज येऊ लागला आहे, कारण. दौंड तालुक्यातील चारही खाजगी साखर कारखान्यांनी सन २०२५-२६ साठी गाळपास आलेल्या ऊसाला सगळ्यांनीच एकसारखी पहीली उचल ३१०० प्रतिटनाप्रमाणे जाहीर केला आहे. विशेष म्हणजे तालुक्याशेजारील कारखान्यांपेक्षा सरासरी २०० रुपयांनी पहीला हप्ता या कारखान्यांनी कमी दिला असल्याने तालुक्यातील ऊस ऊत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे.
यावर्षी तालुक्यातील दौंड शुगर (आलेगाव), भीमा शुगर (पाटस), श्रीनाथ म्हस्कोबा (पाटेठाण), ग्रीन पाॅवर (अनुराज यवत) या चारही साखर कारखाने वेगाने सुरु आहेत. आतील दौंड शुगर, भीमा शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा हे कारखाने उसाबरोबर आसवनी, सहवीजनिर्मिती या उपपदार्थाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. तर नुकताच बंद पडलेला अनुराज कारखाना ओंकार ग्रुपने सुरु केला आहे.
दरम्यान तालुक्याच्या काही अंतरावर असणाय्रा सोमेश्वर व माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी चालुवर्षीच्या गाळपाला येणाऱ्या उसाला पहीली ऊचल ३३०० जाहीर केली आहे. तसेच अडचणीत असलेल्या छत्रपती व निराभीमा साखर कारखान्यांनी ३१०० ऊचल जाहीर केली. तसेच शेजारील शिवाजीराव नागवडे सहकारी कारखान्यांने ३१५० रूपये, तर गौरी शुगर (हिरडगाव ) ३२०० अंतिम दर जाहीर केला आहे.
यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे चारही कारखान्यांच्या पहील्या उचलीकडे लक्ष लागले होते. दरम्यान उशिरा का होईना, झोपेचे सोंग घेतलेल्या कारखान्यांच्या प्रशासनाला जाग आली. दौंङ शुगर, भीमा शुगर, श्रीनाथ म्हस्कोबा, ग्रीन पावर या कारखान्यांनी ३१०० पहीला हप्ता जाहीर करुन पंधरवाङा जमा केला आहे.
दरम्यान चारही साखर कारखान्यांनी ऊसाला स्पर्धात्मक दर देणे गरजेचे होते. परंतु सर्वांनी बहुतेक परस्पर चर्चा करुन एकच पहीली ऊचल दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. वास्तविक चारही कारखान्यांच्या पाठीमागे अनेक बडे प्रस्थ असून उद्योग व्यावसायात त्यांची आघाडी आहे. यामुळे उसाला चांगला बाजार मिळेल अशी शेतकऱ्यांची मोठी आशा होती. परंतु सध्या त्यांचा भ्रमनिरास झालेला दिसत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी संघटीत होऊन लढा उभारणे गरजेचे आहे. परंतु तालुक्यातील शेतकरी गटातटात विभागले गेले असल्याने कारखानदारांचे ऊखळ पांढरे होत असल्याची वस्तुतिथी आहे. तालुक्यातील कारखान्यांना ऊस वाहतुकीचे अंतर कमी असुन दरवर्षी गाळपही चांगले होत आहे. यामुळे इतर कारखान्यांप्रमाणे बाजार मिळणार केव्हा ? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.











