मुंबई : महान्यूज लाईव्ह
अनेकदा कामध्ये गुदमरून मरण्याच्या घटना पण ऐकतो, पण सध्या उन्हाळ्याच्या तीव्र तापमानाच्या काळात कारमध्येच काय घरामध्ये पंख्याशिवाय बसणे ही मुश्किल झाले आहे. अशाच परिस्थितीत बातमी मुंबईतून आहे. सात व पाच वर्षाची दोन लहान भावंडे खेळता खेळता रस्त्याच्या कडेला असलेल्या कारमध्ये बसली आणि गुदमरून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
ही घटना अँटॉप हिल परिसरामधील असून या घटनेमध्ये सात वर्षाचा साजिद शेख व पाच वर्षाची मुस्कान शेख या चिमुकल्या बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फर्निचरच्या दुकानात कारागीर असलेल्या मोहब्बत शेख या व्यक्तीच्या दोन्ही मुलांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
मोहब्बत शेख यांची साजिद व पाच वर्षाची मुस्कान हे दोन मुलं सकाळी खेळण्यासाठी घराबाहेर आली. खेळता खेळता रस्त्याच्या कडेला असलेली कार त्यांनी उघडण्याचा प्रयत्न केला. एरवी रस्त्याच्या कडेला कार लॉक केलेल्या असतात, परंतु ही जुनी कार तशीच उघडी होती. दोघांनी दरवाजा उघडला. आतमध्ये जाऊन बसले, पण अचानक कारचा दरवाजा लॉक झाला. तो दरवाजा उघडता येईना.
इकडे मुले घरी आले नाहीत म्हणून घरच्यांची शोधाशोध सुरू झाली. आसपास शोधले. मुले सापडले नाहीत. मग संध्याकाळी देखील मुले घरी परतली नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला. पोलिसांनी तपासाची दिशा पहिल्यांदा परिसरातील सीसीटीव्हीकडे वळवली.
घरापासून काही अंतरापर्यंत या सीसीटीव्ही मध्ये काहीच आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा परिसरातच शोध घेण्याची सूचना केली. एका महिला पोलिसाने तत्परतेने बंद असलेल्या कारची पाहणी केली आणि दोन्ही मुले गाडीत असल्याचे दिसून आले. तब्बल एक दिवसापेक्षा अधिक काळ लोटला असल्याने मुलांना बाहेर काढले, त्यावेळेस मुले निपचित पडलेली होती. डॉक्टरांनी या मुलांना मृत घोषित केले.