बारामती : महान्यूज लाईव्ह
दसऱ्यासारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी बारामती तालुक्यातील तरडोली गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तात्यासाहेब संपत मासाळ (वय 33) या युवा शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ आणि शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, तरडोली गावातील तुकाईनगर वस्तीत दसरा दिवशी सकाळी सुमारे दहा वाजता ही दुर्घटना घडली. तात्यासाहेब मासाळ आपल्या वडिलांसह घरगुती पाण्याच्या बोरवेलची मोटर सुरू करण्याचे काम करत होते. या वेळी त्यांनी वायरचा जोड देताना अचानक विजेचा जबर झटका बसला. झटका एवढा तीव्र होता की, तात्यासाहेब घटनास्थळीच कोसळले. त्वरित मदतीसाठी धाव घेतली असली तरी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांचे वडील संपत खंडू मासाळ, जे त्याच वेळी जवळ होते, ते थोडक्यात बचावले. वडिलांसमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने वातावरण शोकाकुल झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद सुपा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
तात्यासाहेब मासाळ हे मेंढपाळ व्यवसायासोबत शेती करणारे, मेहनती आणि सर्वांच्या मदतीला धावणारे तरुण शेतकरी म्हणून ओळखले जात होते. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे सणाचा आनंद शोकात बदलला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या अपघातग्रस्त कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामीण भागात विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावी करण्यात याव्यात.











