डॉ. सुजित अडसूळ, बारामती
दिवस: गुढीपाडव्याचा.. वेळ – दुपारी तीनची. स्थळ : बारामतीतील डॉ पांडुरंग गावडे यांचे हॉस्पिटल. घटनेतील पात्र आहे एक ४० -४२ वर्षांचा युवक. आपण आता या घटनेपुरते याचे नाव बदलू. त्याला आपण राहुल म्हणूयात . ( नाम तो सुना होगा!)
तर राहुल आहे फलटण तालुक्यातील एका खेडेगावात राहणारा युवक. तो पहिलीत शिकत असतानाच वडील देवाघरी गेले. भाऊ सिक्युरिटी म्हणुन कुठेतरी काम करतो आणि सध्या आपापल्या संसारात रमलाय. आई भावाकडेच असते. राहुल कसाबसा दहावी झाला. नंतर त्याने ITI केला व आता तो पुण्यात एका कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करतोय.
दोन अडीच वर्षापूर्वी त्याचा एक जीवघेणा अपघात झाला. त्याच्या उजव्या मांडीचे ( Femur) व नडगीचे दोन्ही ( Tibia व Fibula) हाडांना फ्रॅक्चर झाले होते. थोडक्यात म्हणजे पार चक्काचूर झाला होता. त्या वेळेस डॉ. पांडुरंग गावडे यांनी उपचार केले होते, राहुल पूर्णपणे चांगला झाला होता आणि आता तो पुर्णपणे नॉर्मल आयुष्य जगत होता.
हाडे जुळून आली की, त्यात टाकलेले Rods आणि plates काढाव्या लागतात आणि राहुलचे त्यासाठी परत ऑपरेशन होते, म्हणून मी आज आमचे मिञ डॉ. पांडुरंग गावडे यांच्याकडे या सर्जरीसाठी भूलतज्ञ म्हणून गेलो होतो. राहुल च्या पहिल्या अपघातावेळेसही मीच त्याला भूल दिली होती.
साधारणपणे कुठल्याही ऑपरेशन थिएटर च्या बाहेरचे वातावरण संमिश्र भावभावनांचे असतं. काहीवेळा नातेवाईक घाबरलेले, भेदरलेले असतात. त्यांच्या नजरेमध्ये काळजी असते. प्रार्थना असते. विशेषतः एखाद्या सिरीयस पेशंट चे ऑपरेशन करायला जाताना ती भीती, ते टेन्शन आम्हाला लगेच ओळखू येतं, पण त्याच पेशंटचे व्यवस्थित ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला नातेवाईकांशी बोलतो, त्या वेळेला त्यांच्या नजरेमध्ये आमच्याबद्दल आदर,कौतुक आणि आशीर्वाद ही दिसून येतो.
असो .. मी पेशंटला भूल दिली. भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर दोन्ही पायांमध्ये बधिरपणा आला. आम्हाला तेच अपेक्षित आणि हवं असतं. परंतु पोटाच्या वरच्या बाजूला पेशंटला सर्व संवेदना जाणवत असतात आणि पेशंट आमच्याशी बोलू शकतो. शक्यतो भूल चांगली सेट झाली आणि सर्जरी विनासायास सुरु झाली की, रुग्णांशी बोललं की, त्यांचे टेन्शन जरा दुर होते. सगळं छान चालू आहे आणि पेशंटही रिलॅक्स आहे याची खात्री झाल्यानंतर आम्ही संवाद सुरू केला.
मी – तुझं वय किती ? राहुल – सर चाळीशी पार झाली आहे. मी – अरे वा किती छान तब्येत छान आहे तुझी. राहुल – सर मी तब्येतीची काळजी घेतो. मी – घरी कोण कोण असतं? मुलं बाळ काय करतात?
तो – काय सांगू सर.. मोठी स्टोरी आहे.
मग मी जरा अंदाज घेतच बोललो ठीक आहे तू शांत झोपी जा,आपण नंतर बोलूयात.काही काळजी करू नको तुला काही दुखणार नाही. ऑपरेशन व्यवस्थित होईल.
तो – सर मला तुमच्याशी मनातलं बोलायचंय, मी बोलू का? मी – हो नक्की. तो – सर आता माझे वय 40 च्या पुढे गेले आहे. माझ्या मित्रांची साधारणतः 27 – 28 व्या मध्येच लग्न झालेली आहेत. मी मात्र परिस्थितीमुळे शिकत गेलो. जॉब करत गेलो. जगण्याच्या लढाईमध्ये लग्न करायचे राहून गेलं. सुरुवातीला काही स्थळं आली होती किंवा मीही स्थळं शोधली होती, परंतु मुलींना आता शासकीय नोकरी हवी आहे. स्वतःचे घर हवंय. मुलाकडे गाडी हवी आहे, प्रचंड अपेक्षा आहेत आणि आम्ही खेड्यातली मुलं कसंबसं जगत आहोत. आपल्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करत आहोत. त्यामुळे अनेक मुलींनी मला नकार दिला. यात पाच ते सहा वर्ष निघून गेलीत. हळूहळू शेजारच्या गावातल्या, तालुक्यातल्या, पाहुणेरावळ्याच्या मुलींचे स्थळ येणं बंद झालं.
मी – राहुल अरे नको काळजी करूस. स्वर्गातच देव गाठी बांधून जोडपं खाली पाठवतो,असं आपल्याकडे म्हणतात.
आता आमचे सर्जन डॉ. पांडुरंग गावडे हेसुद्धा ऑपरेशन संपत आल्यामुळे आमच्या गप्पांकडे लक्ष देत होते.
पांडुरंग म्हणाले, सर, काय सांगू,ही अतिशय भयानक परिस्थिती झाली आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलीय, जॉब नाहीत, असतील तर जॉबची सिक्युरिटी नाही. पगार तुटपुंजा. महागाई वाढलेली. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यातच महिना कधी संपतो, हेच कळत नाही. ओपिडी त असे अनेक किस्से समजतात.
तेवढ्यात एक दीर्घ श्वास घेऊन राहुल म्हणाला, सर आपली स्थळ बंद झाल्यामुळे मी पुण्यामधील काही एजंटला भेटलो. हे एजेंट्स कर्नाटक मधील एजन्सी शी कनेक्टेड असतात. मग ह्या दोन्ही एजंट्सची फी दिल्यानंतर, कर्नाटकातील एखाद्या गरीब घरातील मुलींशी आपला संपर्क करून दिला जातो. ह्या दोन एजंटच्या कनेक्शनमुळे कर्नाटकात एखाद्या फॅमिलीशी आपली ओळख होते.
त्या मुली महाराष्ट्रात येतात, कधीकधी आपल्याला तिकडे जायला लागतं. आपल्या प्रवासाचा किंवा त्या फॅमिलीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च आपल्याला करायला लागतो. त्यांचं हॉटेलमधलं राहणं, कपडेलत्ते, जेवणखाण, प्रवासाचा खर्च हे सगळं आपल्यावरती येतं. मुली किंवा मुलीचे पालक काहीही खर्च करत नाहीत.
मग काही गोष्टी जुळुन आल्या, तर आपल्याला त्यांना पोटगी सारखी मोठी रक्कम अगोदरच द्यावी लागते. ही रक्कम काही लाखात असते. नंतर लग्न होतं. अशी काही उदाहरणं माझ्यासमोर होती म्हणून मी हाही प्रयत्न करून पाहिलाय. पण मला एकही स्थळ तिथेही मिळाले नाही. येणाऱ्या मुलींचा धर्म माहीत नसतो, जात माहिती नसते. पार्श्वभूमी काही माहीत नसते. त्या येतातच, मुळात एक दोन महिने, कधी सहा महिने, तर एक दोन वर्ष! संसार करतात आणि परत निघून जातात. यात संपूर्ण फसवाफसवी असते.
तो परत सांगू लागला. अगदी त्याच्या भाषेत सांगायचे झाले, तर कर्नाटकातली स्थळं ही अगदीच रिजेक्टेड माल असतो. कधी त्या नवऱ्याने टाकलेल्या असतात, घटस्फोटीत असतात किंवा हे त्यांचे दुसरे तिसरे लग्न असतं. त्यांचा पूर्व इतिहास माहिती नसतो. तो बराच वेळ बोलत होता,त्याच्या मनातल्या सगळ्या भावना बाहेर पडत होत्या. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नव्हते.
आम्ही सर्वजण सुन्न झालो होतो.ऑपरेशन कधीच संपलेले होते.टाके टाकून बराच वेळ होऊन गेला होता. पण राहुल बोलतच होता. एखादा सामाजिक प्रश्न किती भयानक असू शकतो हे मी अनुभवत होतो. आपली सामाजिक व्यवस्था किती पोकळ झालेली आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुलच हा किस्सा होता
गेल्या अनेक वर्षांपासून स्त्री पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी गर्भलिंग जाणून घेण्याची वृत्ती समाजामध्ये नाहीशी होत नाही. समाजातील प्रत्येक स्तरातील – गरीब असो वा श्रीमंत, कुठल्याही जातीचा असो व कुठल्याही धर्माचा, ही जिज्ञासा त्यांना असते. त्यामुळे काही गैरप्रकार घडतात आणि त्याची परिणीती स्त्री आणि पुरुष यांच्या जन्मदरातील विसंगती होते. मुलींचा जन्मदर हा सातत्याने कमी होत आहे. शासकीय स्तरावर यासाठी अनेक कायदे आहेत. पण अजून तरी त्याला यश येताना दिसत नाही.
आज भारताची लोकसंख्या 1 कोटी 41 लाखाच्या जवळपास आहे.भारतातील नागरिकाचे सरासरी वय 28 वर्ष, तर सरासरी आयुर्मान 71 वर्ष आहे. अजूनही देशात नवजात अर्भकाचा मृत्युदर 1000 जन्मात 24 मृत्यू असा आहे. लिंगभेद 1000 पुरूषांमागे साधारणपणे 943 स्त्रिया आहेत. ही समस्या भयंकर आणि भयावह आहे.
सर्जरी संपलेली होती. मी आणि पांडुरंग डॉक्टर्स रूममध्ये कॉफी घेत बसलो होतो. एव्हाना राहुलला रुममध्ये शिफ्ट केलं गेलं होतं. मला राहवलं नाही म्हणून, मी परत त्याला भेटायला गेलो, त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. आणि तो जे वाक्य बोलला ते ऐकून माझ्या अंगावरती शहरा आला.
मी, डॉ. पांडुरंग, हॉस्पिटलचा स्टाफ अगदी सुन्न झालो. राहुल बोलला .. सर,वयाच्या चाळिशी मध्ये हातात थोडेफार पैसे असतात.आम्हाला आमच्या शरीराची भूक भागवता येते हो..! पण डोळ्यातील अश्रू पुसायला कोणीही नाही ही भावनाच भयंकर आहे…! आता तुम्हीच सांगा..तुम्ही राहुलशी काय बोलणार?