दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाईच्या पश्चिम भागातील चिखली परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे शेकडो एकर क्षेत्र वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे मोठं नुकसान झालं आहे. चिखली गावात ढगफुटी झाल्याने वेगवान वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पावसाने शेताचे बांध फुटले आहेत. अनेक ताली वाहून गेल्या आहेत. तसेच घरे आणि गोठ्यावरील पत्रे उडाले आहेत, त्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी चिखली, दसवडी आणि नागेवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन घटनास्थळांची पाहणी केली. यावेळी वाईच्या प्रभारी तहसीलदार वैशाली जायगुडे आणि इतर अधिकाऱी उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे ताबडतोब करून जास्तीत जास्त भरपाई देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
सोमवारी सायंकाळी सहा वाजता अवकाळी पावसामुळे चिखली गावातील संरक्षण भिंती ढासळल्याने ओढ्याचे पात्र बदलले आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. बांध फुटून शेताला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या पावसाने चिखलीतील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
चिखली परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे चिखलीतील अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झालं आहे. दसवडी येथील घराची भिंत कोसळली, नागेवाडी येथील सतिश वसंत जाधव या शेतकऱ्याची म्हैस वाहून गेली. काढणीला आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. तसेच कापणी करून टाकलेल्या पिकांना कोंब आले आहेत. अतिवृष्टीमुळे वाई तालुक्यातील सोयाबीनच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात-लवकर नुकसानभरपाई दिली जाईल, असं आश्वासन यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी दिलं आहे.
यावेळी बापूसाहेब शिंदे, विकास शिंदे, अँड. उमेश पवार, गणेश सावंत, प्रणव थोरवे, कुंदन पवार, सनी पुजारी, किशोर भिलारे, चिखली गावच्या सरपंच जयश्री मोझर, पोलिस पाटील छाया सोनवणे, सुनिल चोरगे, शोभा वाडकर, चेअरमन रमेश वाडकर, सुधाकर वाडकर, रमेश शिंदे, अमित देसाई, कृष्णदेव फणसे सरपंच दसवडी, सागर घाडगे, संतोष पिसाळ, सत्यवान वाडकर, राहूल वाडकर, प्रकाश वाडकर, संदीप देसाई विकास चव्हाण, अक्षय कांबळे, महादेव शिंदे, विष्णू वाडकर, अशोक वाडकर, सुरेश यादव, अनिल मालुसरे तसेच नागेवाडी गावचे सतीश वसंत जाधव, सुरेश सणस, अंकुश सणस, विकास बनसोडे, शिवाजी राजपुरे, मयूर सणस, गणेश सणस, निलेश सणस, यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.