दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई – राज्यातील तहसीलदार दर्जाचे अधिकारी संपावर गेल्याने पहिल्या दिवसापासूनच प्रशासकीय कामकाजामध्ये मोठा व्यत्यय आला असून या आंदोलनात नागरिकांची फरफट होताना दिसत आहे. वाई तालुक्यातील याचा प्रत्यय आज आला.
वाई तहसील कार्यालयातील तहसीलदार रणजीत भोसले, निवासी नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, महसूल नायब तहसीलदार ममता भंडारे, संजय गांधी नायब तहसीलदार गीतांजली गरड, निवडणूक नायब तहसीलदार आशा दुधे, प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार वैभव पवार हे अधिकारी संपावर गेले असल्याने त्यांच्याकडील विविध विभागांमध्ये काम असणाऱ्यांची कामे रखडली आहेत.
खरे तर हे सर्व अधिकारी एरवी वाई तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मग ती नैसर्गिक आपत्ती असो, अथवा ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका असो किंवा ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांची अडचणींची कामे असो, प्रसंगी वेळेची मर्यादा ओलांडून तत्पर सेवा देण्यासाठी कार्यरत असतात.
राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार पदाचा वर्ग दोन चा दर्जा हा राजपत्रित असून देखील त्यांना वेतनश्रेणी मात्र तृतीय दर्जाची दिली जाते राज्य सरकारने यामध्ये सुधारणा करून प्रशासनातील इतर समक्ष पदांप्रमाणे समानता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने वेळोवेळी मागणी केली होती.
मात्र राज्य सरकारने व वेतन त्रुटी समितीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तळमळीची कैफियत फक्त ऐकून घेऊन वेतन श्रेणीच्या विषयाकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले. सन १९९८ पासून राज्य स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने मागणी करून देखील याकडे लक्ष दिले जात नसल्याने अखेर या संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे.
त्याचा परिणाम मात्र सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर होत असून, आज दुसऱ्या दिवशी देखील वाई तालुक्यात देखील या कामाचा बोजवारा उडल्याचे चित्र होते. वाई तालुक्यातील नागरिक हे बव्हंशी दुर्गम भागातील देखील आहेत. त्यामुळे अनेक गैरसोयींचा सामना करून ते जेव्हा तहसील कार्यालयात येतात, तेव्हा त्यांची कामे होणे अपेक्षित असते परंतु त्यांना देखील या संपाचा फटका बसला आहे.