संपादकीय
ऐका हो ऐका.. आटपाट नगरीची ही कहाणी.. मार्च एन्डींगची ही कहाणी..देशाच्या रस्त्याचे मंत्री भारी कर्तबगार.. एकदा ते म्हणाले, या देशातले रस्ते आरशासारखे चकचकीत होणार.. मोठमोठाले रस्ते भारी होणार.. दहा तास लागायचे, तिथे दोन तासांत पोचणार..! टाळ्या वाजल्या.. कामं सुरू झाली.. कामं झालीसुध्दा..!
मग पुन्हा तेच मंत्री म्हणाले, या देशात वाहने कशीही चालवली जातात.. त्यांना कसलीच शिस्त नाही.. या ७० वर्षात या शिस्तीचे पार वाटोळे झाले.. मी यांना शिस्त लावणार..आणि जोडीला मी कायदेही तसेच आणणार..
साहेब बोलले, लायसन नसेल, तर १० हजारांचा दंड करणार.. दोघं बसलेली असतील, तर ४ हजार वेगळे.. लायसन दाखवलं नाही, तर ५०० रुपये दंड, प्रदूषणाचा परवाना नसेल, तर दोन हजार..नंबर प्लेट नसेल, तर दोन हजार.. असा हजारांनीच दंड करणार.. मग बघा कसे सुतासारखे सरळ होतात सगळे… असलं ऐकून साऱ्यांनीच टाळ्या वाजवल्या.. पारावरचा तात्या, रामू, आण्णा, महादा सगळेच खूश झाले.. म्हणाले, आता बघा, सगळा देश कसा सुतासारखा सरळ होणार!
आणि हो, झालंही तसंच.. रस्ते भन्नाट झाले.. फिरस्तीला नवलाई आली.. देश आख्खा गुळगुळीत झाला.. कौतुक भारी झाले.. रणशिंग फुंकले आनंदाचे.. प्रवासाचेही डोहाळे झाले.. राजे महाराजे फिरून आले.. कौतुक मोठे झाले..कायदेही कडक झाले.. गुणगाण भारी.. भारीच होऊ लागले..
पण.. भाऊ, एखादी चांगली वस्तू, देखणी वस्तू असेल तर त्याला दृष्ट लागतेच की.. हो खरंच दृष्ट लागली हो.. बेभान झालेली वाहने धडकू लागली.. पण ते जाऊ द्या.. जरा मस्ती आणि रस्त्याने जाताना सुस्ती असली की, घात तर होणारच.. पण कायदे? ते आता रंग दाखवू लागलेत बरं..! खरंच रस्ता आणि वाहनाचे कायदे एवढे कडक झालेत की, त्याचा फटका यंदाच्या मार्च महिन्यात काहींना बसला.. यापुढं तो साऱ्यांनाच बसेल? कसला फटका म्हणता?
आपण छोट्या गावाचं उदाहऱण घेऊ… असं समजा की.. भिमथडी नावाचं छोटंसं तालुक्याचं गाव.. तिथं रस्त्याच्या अधिकाऱ्यांनी लोकांना कायदा दाखवला.. या कायद्याची झिंग एवढी वाढली की, अनेकांच्या डोळ्यापुढे अंधारी आलीय.. झालं काय की, ऑफिसमध्ये मोठाल्या साहेबानं गुर्मीत सांगितलं.. मार्च एन्डींग आहे, कोणालाही सुट्टी देऊ नका.. ३५-४० लाखांचं टार्गेट आलंय.. झालंच पाहिजे.. आणि जे विरोध करतील, प्रश्न विचारतील, त्यांना साऱ्यांना सांगा, कायदा काय सांगतो?
मग हाताखालच्या साहेबलोकांनी रस्त्यावर वाहने तपासायला सुरवात केली.. एक मोठं भिंग आणलं.. तेवढ्यात आली एक बाई.. तिच्याकडं होती दुचाकी.. तिला नव्हती पुढची नंबर प्लेट.. मग दोन हजाराचा तर दंड ठोठवावा लागंल.. पण काय मज्जा नाही.. तिनं गयावया करायला सुरवात केली.. मग पुढं आली एक सायबिन.. तिनं मोबाईलमध्ये दंडाच्या रकमा पाहिल्या..
नंबरप्लेटला दोन हजार.. हेल्मेट नाही.. दोन हजार.. लायसन नाही-५०००, दाखवलं नाही.. ५०० रुपये.. फॅन्सी नंबरप्लेट किंवा रिफ्लेक्टर्स नसणे – ५००, प्रथम गुन्ह्यासाठी १०००, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १५००, पोलिसांच्या सूचनेचे पालन न केल्यास, पळून गेल्यास- ७५०, अनधिृकत व्यक्तीला वाहन चालविण्यास दिल्यास – ५०००, वाहनाचे परमीट नसल्यास – १०,०००, पीयूसी नसल्यास- १,०००, वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी व तीनचाकी) – १०००
एवढं केलं तरी.. तरीपण साडेचारच हजार होतात.. ४० लाखाचा आकडा कसा गाठणार..? छे.. छे.. काहीतरी चुकतंय.. मग शक्कल लढवली.. अमुक नाही..तमुक नाही.. म्हणत दंड नेला ११ हजारांवर.. सायबीन अगदी मऊ, गुबगुबीत भाषेत त्या बाईला बोलली की, जाऊद्या गाडी.. त्या दुचाकीवरच्या बाईला वाटलं.. बरं झालं.. सोडलं आपल्याला.. पण तेवढ्यात तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर ११ हजारांचं चलन गेलं होतं.. गाडी घेतली २० हजारांना.. सरकारी दंडाचा चुना ११ हजारांचा.. ना दाद ना फिर्याद!
मग रस्त्यावरची फिरस्ती आणखीच कड़क केली.. एक बाप्या पोराला शाळेत सोडायला गेलेला.. यांच्या तावडीत सापडला.. आलंच आहे बकरू.. तर कापायचांच त्याला..! मग पुन्हा सायबिनीनं कंबर कसली.. दंड केला २१ हजारांचा.. एवढा दंड कसा? विचारलं त्यानं.. मग सायबिनीला राग आला.. तू पळून गेला.. गाडी सोडून असंच लिव्हते.. बाईसाहेब म्हणाल्या.. त्यानं केली गयावया.. फरक काहीच पडला नाही.. त्याला काय माहिती, ३०-४० लाख कशाला जात्यात वाया?
दुसऱ्या रस्त्यावर वरात पोचली.. तिथं कॉलेजाला जायला बापाकडनं गाडी घेऊन पोरटं शायनिंगमधी चाललं होतं.. कोण अडवे आम्हाला? अशा अविर्भावात असलेल्या त्या पोरट्याला रस्त्याच्या सायबानं शिट्टी मारत बाजूला घेतलं.. विचारून घेतलं सारं.. लायसन?… आणलं नाही..! गाडीचा परवाना? घरी आहे..! हेल्मेट? आम्ही घालतच नाही अजून इकडं कडक केलं नाही..! पीयूसी? कंपनीची त्रुटी सारं सारं तपासून झालं.. मग दंड आकारला १८ हजार..! पोरानं घरी सांगितलं.. बापाचं काळीज टणकन दोन फूट उडालं.. बाप बोलला.. पोरा, अरं काय केलं ह्ये? गाडीची किंमत तरी तेवढी आहे का? पोरगं बोललं बापाला… बाबा.. अहो, आता कायदाच असा झालाय.. दंड तेवढाच करतेत..! मग बापानं दोन मिनीटं पॉझ घेतला.. काळजावर दगड ठेवून बाप बोलला.. पोरा.. असं कर.. गाडीच त्यांच्या ताब्यात दे..! मग पोरगं गाडीवरून उतरलं.. पोलिस ठेसनात गाडी लावली.. आणि म्हणाला.. साहेब, गाडी तुम्हालाच राहू द्या..!