सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वीज वितरण कंपनीने इंदापूर तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे, परिणामी शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. वीज वितरण कंपनीने वीज तोडणी मोहीम थांबवावी व वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत चालू करावा अशी मागणी इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली. दरम्यान माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही वीज वितरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी वीज जोडणी संदर्भात फोनवरून चर्चा केली.
इंदापूर तालुक्यातील वीज तोडणी मोहीम तात्काळ बंद करावी, या मागणीचे निवेदन इंदापूर तालुका भाजपाच्या वतीने इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांच्यासह भाजप पदाधिकारी यांनी बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांना ऊर्जा भवन बारामती येथे शुक्रवारी (दि.10) दिले. तसेच भाजपच्या शिष्टमंडळाने या विषयावर मुख्य अभियंत्याशी चर्चा केली.
याप्रसंगी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, तानाजी थोरात, दूध संघाचे अध्यक्ष उत्तम जाधव, अरविंद जगताप, स्वप्निल सावंत, दादासाहेब घोगरे, तेजस देवकाते, माऊली चवरे, गजानन वाकसे, आकाश कांबळे, माऊली मारकड, विक्रम कोरटकर, हनुमंत काजळे, अंबादास शिंगाडे, सुभाष काळे, सचिन सावंत, पवन घोगरे, राहुल पाटील, बाळासाहेब पानसरे, बापू लाळगे, स्वप्निल घोगरे आदी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील यांनी यासंदर्भात वरीष्ठ पातळीवर बोलणार या विषयावर निश्चितपणे मार्ग काढू असे म्हणलेले आहे तर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी तालुक्यामध्ये काही भागात उच्च दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने सब स्टेशनला ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी वाढवून उच्च दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.