शिरुर : महान्यूज लाईव्ह
वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास स्वतःबरोबर इतरांच्या ही जीवाला धोका निर्माण होणार नाही. रस्ते अपघातांना मोठा ब्रेक लावता येईल असे मत प्रा. सतीश धुमाळ यांनी व्यक्त केले.
शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. धुमाळ हे बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सुरक्षित प्रवासासाठी सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे त्याचबरोबर समाजात वावरत असताना सजगपणे राहून वाहतुकीच्या नियमांचे पालन होते की नाही हेही पहावे.सध्या वाढते नागरीकरण व शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत असून त्यामुळे वाहनांची संख्या ही वाढत चालली आहे.
अशा परिस्थितीत रस्ते वाहतूक व अन्य नियमाची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. रस्ते अपघातांची संख्या चिंता वाढवणारी असून अनेक दिग्गज व्यक्तींना रते अपघातात प्राण गमवावे लागले आहे.केवळ आठ दिवसांच्या सप्ताह पुरता वाहतूक नियमांचे पालन न करता संपूर्ण वर्षभर पालन केले तर स्वतःच्या खेरीज इतरांचा ही प्रवास सुरक्षित व निर्धोक होईल.शिरूर पोलिस स्टेशन वाहतूक नियमन संदर्भात राबवत असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रा.धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील , पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, वाहतुक शाखेचे पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे, शेखर झाडबुके,भाग्यश्री जाधव, यांच्यासह जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, काँग्रेस आयचे शहाराध्यक्ष ॲड. किरण आंबेकर, माजी नगरसेवक विनोद भालेराव, सामाजिक कार्यकर्ते बापु सानप, अनिल बांडे, सागर नरवडे, अविनाश घोगरे आदी उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक विनोद भालेराव म्हणाले की अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नये व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. संजय बारवकर यानी ही शहरातील वाहतुकी संदर्भात सुचना मांडल्या. पोलिस नाईक राजेंद्र वाघमोडे यानी वाहतुकीसंदर्भातील विविध नियमांची माहिती दिली. तर रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.