सोलापूर – महान्यूज लाईव्ह
अकलूज माळेवाडी भागात झालेल्या विवाहाची राज्यभर चर्चा आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता त्यात महिला आयोगाने उडी घेतल्याने रंगाचा बेरंग झाला आहे. माळेवाडी येथील राहूल फुले या युवकाने अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अतूल अवताडे या नवरदेवावर अकलूज पोलिसांनी कलम ४९४ नुसार द्विभार्या प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. तर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही सोलापूर पोलिस अधिक्षकांनाही यात कारवाईचे आदेश दिले आहेत.
अकलूज-माळेवाडी येथील गलांडे हॉटेल येथे मुंबईतील कांदिवली भागातील रिंकी व पिंकी या दोन जुळ्या बहिणींशी अतुल अवताड़े या नवरदेवाने विवाह केला. एकाच मंडपात झालेल्या या विवाहाची राज्यभर चर्चा आहे. मात्र लग्न झाल्यानंतर मज्जा आहे बुवा असं मित्रांनी म्हणण्याऐवजी आता नवरदेवाला पोलिसांच्या चौकशीचा सामना करावा लागणार आहे.
रुपाली चाकणकर यांनी पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करावी व कायदेशीर कठोर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. तर तत्पूर्वीच अकलूज येथीलच राहूल फुले या युवकाने अकलूज पोलिसांना यासंदर्भात तक्रार दिल्याने अतुल अवताडे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आता मियॉं बिबी राजी तो क्या करे काझी या उक्तीप्रमाणे परस्परसामंजस्याच्या या विवाहात पोलिस चौकशी किंवा गुन्ह्याच्या प्रक्रियेनंतर काय होणार याची उत्सुकता तर आहेच, मात्र कायद्यालाही आव्हान देणाऱ्या नवनवीन घटनांच्या माध्यमातून नवे काय जन्माला येते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.