औरंगाबाद : महान्यूज लाईव्ह
आपल्या हाडाची काडे करून मोठा केलेला आपलाच पोरगा कधीकाळी आपला जीव घेईल याची कल्पनाही त्या मातापित्यांनी केली नसेल. पण केवळ ७०० रुपयांवरून वडील बोलणे म्हणून या कुपुत्राने आपल्या वडिलांचा आणि सावत्र आईचा निर्घृण खून केल्याचे औरंगाबाद येथे उघड झाले आहे.
औरंगाबादेतील पुंडलिक नगर येथे आज सकाळी एका घरात कुजलेल्या अवस्थेतील कलंत्री दांपत्यांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांचा मृत्यू कसा झाला, याचे कोडे औरंगाबाद पोलिसांनी उलगडले आहे. त्यांच्या मुलानेच या दोघांचेही खून केल्याचे आता उघड झाले आहे.
पुंडलिकनगर येथे शामसुंदर हिरालाल कलंत्री ( वय ५५ ) यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी मुलगा आकाश याने हिशोबात ७०० रुपयाचा घोळ केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून बापलेकात भांडण झाले. या वादात संतापलेल्या किरणने आपल्या वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यावेळी घरात असलेल्या सावत्र आई किरण ( ४५ ) यांच्यावरही त्याने हल्ला करून त्यांचीही हत्या केली. त्यानंतर दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला.
आईवडिलांचा खून केल्यानंतर आकाशने सावत्र बहिणीला आपण आईवडिलांसह धुळे येथे जात असल्याचे सांगितले. त्यानंतर रविवारी वडिलांना फोन लागत नसल्याने मुलगी घरी आली, पण घराला कुलुप पाहून परत तिच्या काकांकडे गेली. त्यानंतर सोमवारी ती पुन्हा आली. त्यावेळी घरातून तीव्र दुर्गंधी येत होती. त्यामुळे हा सगळा प्रकार पोलिसांपर्यंत पोचला. पोलिसांनी घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केल्यावर दोन्ही मृतदेह त्यांना सापडले.
बहिणीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांचा संशय किरणवर गेला. त्याचे मोबाईल लोकेशन ट्रेस करत असता तो शिर्डीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शिर्डी पोलिसांना संपर्क साधला. शिर्डी पोलिसांनी लगेचच कारवाई करत आकाशला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर त्याने आईवडिलांची हत्या केल्याची कबुली दिली .