पुणे : महान्यूज लाईव्ह
सोनी मराठीवरील ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. या मालिकेतील सगळे कलाकारही प्रेक्षकांचे खुप आवडते आहेत. समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार ह्या यातील जोडीने तर खुपच लोकप्रियता मिळवली होती. मात्र आता विशाखाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखाने सोशल मिडियावर पोस्ट लिहून तिने हास्यजत्रा सोडल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.
आपल्या या पोस्टमधून तिने आपला आजवरचा सगळा प्रवास मांडला आहे. २०११ पासून कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन आणि हास्यजत्रा. या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या १५ मिनिटांच्या स्कीटमधील असंख्य भुमिका विशाखाने रंगविल्या.
आता मात्र थोड थांबण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आता तिला दररोज १५ मिनिटांच्या भुमिका करण्यापेक्षा थोड्या जास्त लांबीची भुमिका करण्याची इच्छा आहे. मग ती नाटकातील असेल, किंवा एखाद्या टिव्ही सिरियलमधील, किंवा एखाद्या चित्रपटातील. तिथे वेळेचे बंधन थोडे सैल असेल. थोड्या स्वस्थपणाने भुमिकेचा विचार करता येईल. थोड्या सावकाशीने भुमिकेत खोलवर शिरून तिचे कानेकोपरे धुंडाळता येतील, अशा एखाद्या भुमिकेच्या शोधात आता विशाखा आहे.
हास्यजत्रेच्या यशाच्या शिखरावर असलेल्या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय काही सोपा नसतो. पण विशाखाने तो घेतला आहे. पण अर्थातच तिने अभिनय सोडलेला नाही. त्यामुळे कोणत्या ना कोणत्यातरी भुमिकेतून ती आपल्याला भेटेलच.
मात्र अजुन काही दिवस ती हास्यजत्रेत आपल्याला दिसेल. कारण त्या भागांचे शुटींग विशाखाने पुर्ण केलेले आहे. त्यामुळे हास्यजत्रेत विशाखाला बघण्याची ही शेवटची संधी असेल.