मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘ ईडी आहे की घरगडी ? देवेंदजी, तुम्हाला केंद्राने रॉ – वर वैगेरे घेतले पाहिजे. ‘ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार प्रतिहल्ला चढवला. केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात धाडींचे सत्र सुरु केले आहे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधीमंडळात पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडत आहेत. नवाब मलिकांच्या अटकेनंतर ईडी आता मुख्यमंत्र्याच्या मेव्हण्यापर्यंत पोचली. परंतू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर जाहिररित्या काही बोलले नव्हते. मात्र आज विधीमंडळात उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली.
‘आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केली आहे का ? मला तुरुंगात टाका, पण कुटुंबियाच्या मागे लागण्याचा नीचपणा करू नका. ‘ इंदिरा गांधीनी आणीबाणी आणली होती, पण आता देशात अघोषित आणीबाणी असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात बोलताना हा जोरदार शाब्दिक प्रतिहल्ला चढविला. ‘ मी आहे हा असा आहे. मी कसा आहे हे लोकांना माहित आहे आणि तसाच राहणार. बदनामीला घाबरत नाही, पण बदनामी करताना कोणत्या थराला जाऊन करायची ? ‘
‘ नवाब मलिक जर तुमच्या मताप्रमाणे दाऊदचे हस्तक आहेत तर ते मुंबईत आणि संपूर्ण देशात फिरताहेत, ते चार चार पाच पाच वेळा निवडून येत आहेत. ते मंत्री बनताहेत तरी केंद्रातल्या यंत्रणेला ते दिसले नाहीत. त्यांना माहितीच नाही. केंद्राच्या यंत्रणा मग करतात काय? ‘ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेची झोड उठवली.
ओबामांनी ओसामाला पाकिस्तानात घुसुन ठार मारले. दाऊद आहे कुठे हेदेखील भारतातील तपास यंत्रणा सांगू शकत नाहीत. तुम्ही दाऊदला जिथे असेल तिथे घुसुन मारा. तसे न करता केवळ दाऊदच्या नावाने केवळ राजकारण होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ईडीला काहीच माहिती नसते, भाजपचे लोक जी माहिती पुरवतात, त्याप्रमाणे ईडी कारवाई करते, असा उपरोधिक टोला लगावून ‘ ही ईडी आहे की घरगडी ‘ हेच कळनासे झाले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढविला.