सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : आमच्या टीकाकारांनी आमच्यावर उगवतीचा व मावळतीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने व पाय धरून कारखान्याची खुर्ची टिकवत असल्याचा आरोप केला होता. मात्र ते म्हणाले, तसे उगवतीच्या दिशेचे किंवा मावळतीच्या दिशेचे नेते हे आमचे आदराचे स्थान आहे. त्यांचे आम्ही नेहमीच मार्गदर्शन घेतो. यापूर्वीही घेत होतो. आजही घेतो आणि यापुढेही घेऊ, परंतु कोणतीही निवडणूक न जिंकता दीड वर्ष संचालकांच्या सभागृहात सभागृहाचे सदस्य नसताना कोणाच्या आशीर्वादाने आपण बिनधास्त बसत होतात? कोणत्या उगवतीच्या व मावळतीच्या नेत्यांचे पाय धरून बसलात याचे आत्मपरीक्षण संबंधितांनी करावे अशी बोचरी टीका छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केली आहे.
दोन दिवसापूर्वी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांना सहा प्रश्न विचारले होते. त्यावर काटे यांनी प्रत्युत्तर देताना वरील टीका केली आहे. काटे म्हणाले, जोपर्यंत विरोध हा संस्थेशी संबंधित आहे, तोपर्यंत आम्ही संयम धरू, मात्र विरोध वैयक्तिक होत असेल तर आमचा संयम उरणार नाही. आमच्याकडे देखील बोलण्यासारखे बरेच काही आहे आणि आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
ते म्हणाले, विरोधकांना नेहमीच बाऊ करण्याची सवय लागली आहे. त्याचा एक पुरावा म्हणजे बिगर ऊस उत्पादक सभासदांना 16 कोटींची साखर जाते आणि 16 कोटी रुपये तोटा होतो असा जावईशोध त्यांनी लावला आहे. मुळात सध्याचे साखर वाटप होते, ते मोफत होत नाही तर ते 21 रुपये प्रतिकिलो अशा सवलतीच्या दरात विक्री होते.
साखरेच्या किमान विक्री किमतीचा विचार करता दहा रुपये प्रति किलो एवढा नुकसानीचा भार कारखान्याला सोसावा लागतो, मात्र हा कारखाना ऊस उत्पादकांच्या जीवावर, कष्टावर, घामावर उभा राहिलेला आहे आणि तो ऊस उत्पादक सभासद यांच्या हितासाठीच असला पाहिजे. अर्थात साखर विक्रीच्या नुकसानीचा भार हा वर्षाकाठी 1 कोटी 15 लाख रुपयांचा आहे. म्हणजेच तो 5 वर्षांमध्ये 5 कोटी 75 लाख रुपयांचा झालेला आहे. मात्र वस्तुस्थिती लक्षात न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी 16 कोटींचा जावईशोध त्यांनी लावला आहे.
आज जे बिगर ऊस उत्पादक सभासद दिसत आहेत, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य हे कारखान्याचे ऊस पुरवठादार सभासद आहेत हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या कुटुंबातील सभासद अधिक झाले आणि उसाचे क्षेत्र अपुरे असेल तर त्याठिकाणी काही वेळा एखाद्या ऊस उत्पादक सभासदाच्या नावावर ऊस जात नाही ही अनेक कुटुंबांची वस्तुस्थिती आहे. हा विषय केवळ व्यावहारिक नव्हे तर भावनात्मक व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील देखील आहे. छत्रपती कारखान्यामध्ये या 14 हजार सभासदांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांप्रमाणे शेअर्स ठेवलेले आहेत.
त्यांनी एकेकाळी या कारखान्याची बूज राखलेली आहे. अगदी त्यांची शेअर्सची रक्कम जरी लक्षात घेतले आणि त्याचे संभाव्य व्याज जर विचारात घेतले, तर आपण जी साखर देत आहोत, ती साखर ऊस उत्पादक असलेल्या सभासदांच्या घरातच जाते हेही लक्षात घेतले पाहिजे. मात्र जर आपण स्वतः केले तरच ते खरे आणि इतरांनी केले तर ते पूर्ण खोटे अशी आवई उठवायची विरोधकांची जुनी सवय आहे. वस्तुतः 2003 पूर्वीच्या काळात देखील अनेक सभासद हे बिगर ऊस उत्पादक होते, त्यावेळी या महाशयांनी अशी कारवाई का केली नाही?
छत्रपती कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने केला आहे. हे करत असताना कारखान्याच्या आर्थिक हितासाठी, पर्यायाने सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी येणाऱ्या काही हंगामापर्यंत जास्तीत जास्त गाळप करावे लागणार आहे.
त्याचा परामर्श घेत मागील काळात विरोध करणाऱ्यांच्या काही चुकांपासून बोध घेत या वर्षी संचालक मंडळाने खूप चांगल्या पद्धतीने गळीत हंगाम करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवत आम्ही उद्दिष्टापर्यंत पोचलो आहोत. पाठीमागच्या काळात काही जणांनी पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला आणि गाळप हंगाम कसा व्यवस्थित होणार नाही याची अधिक दक्षता घेतली, मात्र प्रत्यक्षात बाहेर संभ्रम निर्माण करत आपणच कसे काम चांगले करतो अशा प्रकारचा दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर्षी अशा कोणत्याही व्यक्तीची लुडबुड आम्ही चालू दिली नाही. त्यामुळेच हा हंगाम सुरळीत चाललेला आहे आणि हा हंगाम सुरळीत चालण्यासाठी सभासदांनी सुद्धा आम्हाला सातत्याने पाठबळ दिले आहे.
अशा परिस्थितीमध्ये गाळप हंगाम जेवढा जास्त होईल तेवढा कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहे. आणि पर्यायाने सभासद आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत, ही बाब माहीत असल्यानेच किंबहुना कारखाना अधिक क्षमतेने चांगल्याप्रकारे सक्षम झाला तर आपल्याला राजकारण करता येणार नाही याची जाणीव असणारे सध्या या संदर्भात आम्हाला टीकेचे लक्ष्य करत आहेत.
मात्र त्यांचे प्रहार हे सन्मानाचे हार समजून आम्ही यापुढे काम करत राहू आणि त्यांनी अशाच प्रकारे आमच्यावर टीका करावी. त्यांचे काम आहे ते आयुष्यभर टिकाच करत राहतील अशी अपेक्षा आहे. वास्तविक पाहता छत्रपती कारखान्याचा गळीत हंगाम हा केवळ सन २०२०-२१ चे नाही, तर त्यापूर्वी ते आजपर्यंत व्यवस्थितच सुरू आहे.
सारे कामकाज सुरळीत सुरू आहे आणि याला सुरळीत आणण्यासाठी सभासद, कामगार, ऊसतोड मजूर, अधिकारी, व्यवस्थापन यांचे श्रेय कारणीभूत आहे. आम्ही फक्त विश्वस्त आहोत आणि आम्ही आमचे काम करत आहोत. जर आज कारखान्याचा हंगाम सभासद, कामगार, मजूर व अधिकारी यामुळे व्यवस्थित सुरळीत पार पडत असेल, तर तो यापूर्वीही त्यांच्यामुळेच पार पडत होता हेही सर्वांनी लक्षात घ्यावे.
छत्रपती कारखान्याचा सभासदांची रूपांतरित ठेव जी शिल्लक आहे, ती सभासदांच्या खात्यावर जमा केलेली आहे. या वर्षी केवळ छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर वातावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे उसाला तुरे आलेले आहेत.
अशाही परिस्थितीत देखील उसाचे गाळप जास्तीत जास्त केल्याशिवाय कारखान्याकडून समस्या संपणार नाहीत, याची सभासदांना पूर्ण माहिती असल्यामुळे सभासदांनी आमच्या पाठीमागे भक्कम असे पाठबळ उभे केले आहे. त्यामुळे इतर कोण काय टिका करते याकडे आम्ही लक्ष न देता, आम्ही आमचे काम नेमस्तपणे करत आहोत.