नगर : महान्यूज लाईव्ह
आज नगरमधील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचा शुभारंभ करण्याच्या कामावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari says ethanol pumps and all byke and four wheeler are on only ethanol) एक किस्सा महत्वाचा सांगितला, जो येत्या काळात भारतातील इंधन दरवाढ आणि ऊस उत्पादकांच्या समस्येवर दिर्घकालीन तोडगा काढणारा उपाय असणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, ४५० जणांनी इथेनॉलसाठी परवानगी मागितली आहे. जेवढे इथेनॉल तयार कराल, तेवढे भारत सरकार विकत घेईल. इथेनॉल ग्रीन इंधन आहे. ते पेट्रोलपेक्षा चांगले आहे. ब्राझीलमध्ये इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालतात. इथे २० टक्के इथेनॉल मिश्रणाला सरकारने परवानगी दिली आहे. मला १०० टक्के इथेनॉलवर चालवायची इच्छा आहे. बजाजने अशी बाईक तयार केली आहे.
इथेनॉल ६५ रुपये तर पेट्रोल १०० रुपयांपेक्षा अधिक पोचलेले आहे. आपला शेतकरी वीजही देऊ शकतो आणि इंधनही देऊ शकते. केंद्र सरकारने इथेनॉलचे पंप सुरू केले आहेत. आता सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉलचे पंप सुरू करावेत. माझ्या कारखान्याचे २८ पंप आहेत. तेथे सर्व ठिकाणी इथेनॉलचे पंप सुरू करणार आहे.
मी एक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. युरो ४ मानकावर इथेनॉलवर गाड्या चालवल्या, तर प्रदूषण खूप कमी होते. प्रतिज्ञापत्राला मान्यता मिळाली की, हा नियम लागू होणार. त्यानुसार सगळ्या कंपन्यांच्या गाड्या मग, त्या मर्सिडीज बेंझ असो की, जग्वार. अथवा टाटा, महिंद्रा कोणत्याही गाड्या असोत. आता पेट्रोलच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर चालवाव्या लागणार आहेत.
फ्लेक्स इंजिन म्हणजे गाड्यांच्या किंमतीत काहीही वाढ होणार नाही. आणि फारसा फरकही होणार नाही. यामध्ये फक्त बॉश कंपनीचा जो फिल्टर असतो, त्यात जे वॉशर स्टीलचे आहेत, ते रबराचे करायचे, एवढाच त्यामध्ये बदल असणार आहे.
त्याला किंमत वाढत नाही. सर्वोच्च न्यायालयातील या प्रतिज्ञापत्राला एकदा परवानगी मिळाली की, मोटारसायकल, स्कूटर, पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व गाड्या इथेनॉलच्या फ्लेक्स इंजिनवरच चालवाव्या लागणार आहेत. अहो, ब्राझीलमध्ये विमाने इथेनॉलवर चालतात. मग भारतात का अशक्य आहे? शेतकऱ्यांनीच येणाऱ्या काळात इथेनॉलला चालना दिली पाहिजे. तसे केले, तर इंधनासाठी जे १२ लाख कोटी लागतात, त्यापैकी ५ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोचतील.
गडकरी म्हणाले, साखर तयार करणे म्हणजे तर नुकसानीचाच भाग आहे. खरेतर जगातला हा एकमेव धंदा असा असेल, ज्याचा माल तयार केल्यानंतर स्टॉक करायचा, मग त्याच्या खरेदीचे पैसे देण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घ्यायचे. मग त्याची गिऱ्हाईक मिळेल तशी विक्री करायची. असा कोठे धंदा आहे का?
मी सुध्दा कदाचित मागच्या जन्मी पाप केले, म्हणून तीन कारखाने चालवतो, आता बाहेर पडलोय, मात्र असा धंदा कोठे पाहिला नाही. अर्थात एवढे का आपल्याला कळत नाही की, कारखाना जिवंत राहीला तर शेतकरी जिवंत राहणार आहे. आता मात्र भाव दिला नाही, म्हणून कारखान्यांवर कारवाई करण्याचे निर्णय निघतात. कारखानेच मोडीत निघाले तर कितीही ऊस पिकवला तरी काही उपयोग होणार नाही.
साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे शोषण करू नये, ब्राझीलमध्ये २२ रुपये साखरेचा भाव होता. आम्ही किमान भाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल ठेवला. दोन रुपये अजून वाढवायचे होते, मात्र ग्राहकांवर परिणाम होतो, अशी चर्चा झाल्याने आम्ही ते दोन रुपये वाढवू शकलो नाही. आज मात्र ब्राझीलमध्ये साखर उत्पादन कमी असल्याने दोन महिन्यांची साखऱेच्या दरात तेजी आली आहे.
येणाऱ्या काळात साखर जास्तीत जास्त निर्यात करावी. आपली २४० लाख टनांची गरज, मागील वर्षी ३१० लाख टन उत्पादन झाले आहे. आपल्या गरजेपेक्षा ७० लाख टन अधिक झाली आहे. आता साखरेला म्हणावा तेवढा उठाव नाही. साखरेचे असेच अर्थशास्त्र उलटे फिरले, तर शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. पवारसाहेब शुगरकेन ज्यूस ते इथेनॉलसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न व पाठपुरावा करीत आहेत. भारत सरकारने पाचत वर्षासाठी इथेनॉल खरेदीचा करार करू पाहत आहे. त्यामुळे साखर तयार करू नका, इथेनॉल तयार करण्यावर भर द्या.