संपादकीय..
भाजपने आज महाराष्ट्र बचाओ हे आंदोलन केले. त्याची तयारी अगदी नियोजनपूर्वक सुरू होती. अगदी आज काय परिधान करायचे, किती वाजता आंदोलन करायचे, बातम्या कशा प्रसिध्द झाल्या पाहिजेत इथपर्यंतच्या इत्थंभूत तयारीने भाजप या आंदोलनात उतरला होता. मात्र या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रद्रोही बीजेपी च्या नावाने उत्तर दिले. त्याचा परिणाम असा की, अनपेक्षितरित्या आज ट्विटरवर महाराष्ट्रद्रोही बीजेपी हा ट्रेंड खूप चालला आणि भाजपनेच सन २०१४ मध्ये उभा केलेला सोशल मिडीयाचा भस्मासूर भाजपवरच उलटला हे सिध्द झाले. आज सोशल मिडियात भाजपची आयटी सेल प्रचंड मजबूत असतानाही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपच्या नेत्यांवर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांमुळे कधी व्हिडीओ तर कधी संपूर्ण पोस्टच डिलीट करण्याची नामुष्कीची वेळ येत आहे. आज मेरा आंगण, मेरा रणांगण चीही तीच अवस्था झाली. भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनीच या आंदोलनापासून पाठ फिरवली. काही ठिकाणी अगदीच राजकारणातला ओ की ठो कळत नाही अशा निरागस लहान मुलांना आंदोलनात उभे करावे लागले. खरेतर सत्ता नसली की, त्याचा उदासिन परिणाम होतोच, मात्र भाजपची महाराष्ट्रातील नेतेमंडळी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर उपयोग राज्यात करून घेत असताना आज भाजपच्या आयटी सेलला राज्यभरातील नेटकऱ्यांपुढे मान तुकवावी लागली. एक लाखांहून अधिक ट्रोलचा ट्रेंड ट्विटवर होता. त्यामुळे पहिल्या तीन मध्ये आज महाराष्ट्रद्रोही बीजेपी हा ट्रेंड पोचला होता. एखाद्या राजकीय आंदोलनाची उलट्या पध्दतीने झालेली ही अवस्था मानावी लागेल.
खरंतर कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर आ वासून उभे असताना या कोरोनाच्या महामारीत भाजपने हे आंदोलन केले. त्याला राज्यातील सामान्य लोकांचा पाठींबा नव्हता असेच यातून दिसते. त्याचे कारण असे की, कोरोनाचे संकट ज्या पध्दतीने संपूर्ण जगावर आहे, ते पाहता अशा प्रकारच्या संकटाची कोणी कल्पनाही केली नव्हती, किंवा असे संकट आल्यास त्याची उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाय कसे करायचे याची कोणतीही माहिती कोणत्याही अगदी अमेरिका, चीनसारख्या महासत्तांकडेही नव्हती. अशावेळी संपूर्ण देशातील कोणतीही जहाजे, विमाने मुख्यत्वे जिथे येतात, त्या मुंबईत त्याचा प्रादुर्भाव होणार नाही असे कसे म्हणता येऊ शकेल? मुळात कोणतीही आपत्ती आली की, सारे विरोध विसरून सत्ताधाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोधक काम करतात ही आजवरची लोकशाहीतील पध्दत आहे. देशाच्या सर्व राज्यांमध्ये हे घडते. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षात राजकारणापलीकडे काहीच दिसत नसलेल्यांनी या परंपरेला तिलांजली देत विद्वेषाचे राजकारण अधिक पेरले. वस्तुतः देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना महापूराच्या संकटात, सामाजिक आंदोलनांच्या काळात विरोधकांनीही टिका केली, मात्र टिका संयत होती व टिकेपेक्षाही त्या काळात विरोधकांनी राज्य सरकारला अंशतः का होईना पण साथच दिली. मुख्यमंत्री निधीमध्ये विरोधकांच्या ताब्यातील संस्थांनी, विरोधकांच्या आवाहनानुसार व्यक्तींनीही मुख्यमंत्री निधीत भरघोस मदत केली. मात्र हे चित्र आता का दिसले नाही? फडणवीस आज विरोधी पक्षनेते आहेत, ते जबाबदार आहेत. राज्याचा पाच वर्षे कारभार त्यांनी पाहिला आहे. कोठे अडचणी असतात हे त्यांना चांगलेच माहिती आहे. मग त्यांनी कोरोनाच्या काळात सत्ताधारी सरकारला मदत करून कोरोनातून बाहेर पडल्यानंतर खिंडीत गाठले असते, तरी संयुक्तिक ठरले असते. राजकारणावेळी राजकारण हा त्यांचाच शब्द अगदी प्रत्ययास आला असता. मात्र ज्यावेळी कोरोनाचे संकट डोक्यावर तलवारीसारखे टांगलेले आहे, राज्यातील जनता भयभीत आहे, अशावेळी सरकार कसे अस्थिर होईल याच्या चाली खेळल्या. राज्यातील जनतेच्या हे लक्षात येण्यास वेळ लागला नाही.
मुळात सुरवातीला राज्यात आमदारकीच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांना डळमळीत करायचे, सरकार पाडायचे यासाठी सातत्याने राजभवनाच्या पायऱ्या चढणाऱ्या भाजप नेत्यांविषयी राज्यात संतापाची भावना होती. ती भावना केंद्रातील नेत्यांपर्यंत पोचली आणि त्यांनी यात काढता पाय घेतला. पीपीई किट राज्याला पुरविण्याबाबतही केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत हा राज्याचा आजही आक्षेप आहे. राज्याचे हक्काचे जीएसटीचे पैसे राज्याला दिले नाहीत, राज्य अडचणीत असताना जे राज्य सर्वाधिक महसूल देते, त्याच राज्याच्या वाट्याला कमी पैसे पाठविणाऱ्या केंद्र सरकारविरोधात एक शब्द विरोधी पक्षांनी काढला नाही, किंबहूना केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून हे पैसे आणले असते व त्याचे श्रेय घेतले असते, तर भाजपाचा रुबाब आज राज्यात आणखी वाढला असता. मात्र राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असताना मदतनिधी मात्र पंतप्रधान निधीलाच, त्यातही पंतप्रधान केअर फंड या स्वतंत्र कोषात जमा करण्यासाठी आग्रह याच मंडळींनी धरला आणि त्यामुळेच राज्यात ते टिकेचे धनी बनले. तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह सारे मंत्री पीएम केअर फंडातच पैसे जमा करण्याचे आवाहन करीत होते, हे राज्यातील सामान्य जनतेला रुचले नाही. त्यातून नेटकऱ्यांचा भडीमार भाजपच्या नेत्यांना सहन करावा लागला. आजच्या राज्य सरकारचे काम काही चांगले चालले आहे असे मानण्याचे काहीच कारण नाही, त्रुटी अनेक आहेत. आरोग्यव्यवस्थेत उदासिनता बोकाळली आहे. सरकारी व्यवस्था संकटाच्या काळातही भ्रष्टाचार करायचे सोडत नाही. मात्र तरीदेखील जनतेचा म्हणावा तेवढा रोष सरकारवर नाही. त्याचे कारण भाजप हा पक्ष देखील आहे. जानेवारीत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णानंतर विमानसेवा बंद केली असती, तर हे चित्र दिसले नसते या टिकेपुढे भाजपच्या नेत्यांची ततपप होत असल्याने या संकटाच्या अडचणींचे खापर केंद्र सरकारवरही फोडले जात आहे. खरेतर भाजपने या मानसिकतेचा अभ्यास करायला हवा. आपणच उभा केलेला भस्मासूर आपल्यावर का उलटला याचाही विचार करायला हवा आणि जनतेच्या मानसिकतेचा अभ्यास करून नव्याने धोरणे आखायला हवीत. अन्यथा असले ट्विटरवरचे ट्रेंड कायमच सत्तातुर भाजपच्या विरोधात जात राहतील आणि राज्यातील विश्वास असाच भाजप गमावत राहील.











यथार्थ विष्लेशण
आता महाराष्र्टातुन कायमच हद्दपार करायच आहे या नतद्रष्ट,सत्तापिपासु,निच दंगेखोर,भामट्यानां.हा महाराष्र्ट आहे,येथे शिवरायाच्या पदस्पर्शाने पावन या भुमीवर,डाॅ.बाबासाहेब,फुले,शाहु प्रबोधनकार ठाकरे यांचा सार्थ अभिमान असलेली जनता आता मुळापासुन उचकटुन टाकायला उत्सुक आहे.