महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हापासून ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस आणि ग्रामपंचायतींनी जो दंड वसूल केला, तो तब्बल ३० कोटी १८ लाख रुपये आहे. या काळात तब्बल २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल झाले आणि तब्बल ४० हजार लोकांना या काळात अटक झाली.
राज्यात कोरोनाच्या काळात विनामास्क फिरणाऱ्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिका यांच्यासाठी पोलिसांनी मदत करीत दंड वसूल केला. ती वसुली अजूनही सुरूच आहे. ८ ऑक्टोबरपर्यंतचा दंडाच्या वसुलीचा आकडा तब्बल ३० कोटींचा असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली, तर इकडे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दिलेल्या माहितीत पुणे विभागात ११ कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती दिली.
राज्यात मागील आठ महिन्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७० घटना घडल्या. त्यामध्ये ८९० व्यक्ती सहभागी होत्या. या काळात राज्यात पोलिसांच्या मदतीसाठी १०० क्रमांकाच्या फोनवर तब्बल १ लाख १३ हजार जणांनी संपर्क साधला आणि पोलिसांनी या काळात ९६ हजार ५४७ वाहने जप्त केली अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.











