बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना वेगाने राबविण्यात येत आहेत. बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २१ गावांचा टंचाई जाहीर करण्याचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यापैकी काही गावांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून संबंधित ठिकाणी टँकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पंचायत समितीमार्फत प्रांत कार्यालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा केल्यानंतर गाडीखेल, सोनवडी (सुपे), देऊळगाव रसाळ, थोपटेवाडी आणि अंजनगाव या पाच गावांसाठी पाणीटँकर मंजूर करण्यात आले आहेत. या गावांमध्ये उद्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती तावरे यांनी दिली. तसेच कारखेल गावाचा प्रस्तावही सोमवारी मंजूर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
उर्वरित टंचाईग्रस्त गावांची पाहणी करून लवकरच तेथेही टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय इतर गावांना टंचाई घोषित करण्याचे प्रस्ताव प्रांत कार्यालयात प्रलंबित असून त्यावरही लवकर निर्णय अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमार्फत जिरायत भागातील गावांमध्ये पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याची योग्य काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
तसेच उर्वरित गावांचे प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याबाबत ग्रामसेवकांना निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुढील दोन दिवसांत तालुक्यातील जिरायत भागाचा दौरा करून पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांच्या चाऱ्याची स्थिती प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचेही सभापती किरण तावरे यांनी स्पष्ट केले.











