दौंड : महान्युज लाईव्ह
वाढती महागाई, भुमिहीन आणि बेघरांना घर द्या, झोपडपट्टी कायम करा,राज्यात राज ठाकरे यांच्या मुळे निर्माण झालेली अस्वस्थता अशा विविध प्रश्नांवर आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दौंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने दौंड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा मंगळवारी काढला.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड रिपब्लिकन पक्षाने मंगळवारी ( दि १०) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक ते दौंड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात आंदोलकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष करीत त्यांच्या भोंगा व हनुमान चालीसा यावर जोरदार टीका केली. राज्यात धार्मिक दंगली आणि अस्वस्थता निर्माण करण्याचे काम राज ठाकरे करीत आहेत असा आरोप या वेळी आंदोलकांनी केला.
राज्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी या विषयावर सरकारचे लक्ष वेधले. तसेच सरकारी नोकरीतील बढतीमध्ये आरक्षण कायम करावे, शासनाच्या जागेतील झोपडपट्टयांना कायम स्वरूपी करावी,रेल्वे हद्दीतील झोपड्या पूर्नवसना शिवाय काढू नये,विज बिल दरवाढ रद्द करावी, ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम करावे,अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे संरक्षणाचा कायदा करावा, अनुसूचित जाती- जमाती विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती विनाविलंब देण्यात यावी, भूमीहीनांना जमीन मिळावी व इनाम वर्ग जमीनीचे खरेदी विक्री व्यवहार बंद करावे, सर्व आर्थिक विकास महामंडळाची नविन कर्ज प्रकरणे त्वरीत सुरु करावीत अशी विविध मागण्या या मोर्चात करण्यात आली. या संदर्भातील मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी स्वीकारले.
या मोर्चात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र कांबळे, दौंड पंचायत समिततीचे उपसभापती आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते विकास कदम, नागसेन धेंडे, प्रकाश भालेराव, भारत सरोदे, नरेश डाळींबे,सतीश थोरात तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.