मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारतातील मिसाईल्सची देखभाल सुरू असताना एक मिसाईल ‘ चुकून ‘ पाकिस्तानच्या दिशेने उडाल्याची घटना काल परवाकडे घडली होती. या उडालेल्या मिसाईलने पाकिस्तानची मात्र चांगलीच तारांबळ उडाली असल्याचे दिसते आहे. दोन तीन दिवस झाले तरी पाकिस्तानात यावर चर्चा चालूच आहे.
हे मिसाईल पाकिस्तानात जवळपास १२४ किमी अंतरावर जाऊन पडले. ते जवळपास ३ मिनिटे पाकिस्तानच्या आकाशात होते. या सगळ्या प्रकाराने पाकिस्तानात अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे.
हे मिसाईल जिथे पडले तेथून जवळच १०० मीटरवर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचे घर आहे असे म्हणले जात आहे, यामुळेही पाकिस्तानात या घटनेबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे.
या चुकून उडालेल्या मिसाईलने पाकिस्तान आपल्या सीमांचे रक्षण करण्यास सक्षम नसल्याचेही म्हणले जात आहे. आपल्या देशाच्या आकाशात आलेल्या या वस्तूला ओळखून ती आकाशातच नष्ट करण्याची यंत्रणा पाकिस्तानात नाही, हे या घटनेने सिद्ध झाले आहे.
भारताने ही घटना चुकून घडली असे सांगत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण भारताच्या प्रत्येक भुमिकेवर संशय घेणाऱ्या पाकिस्तानानातील अनेकांना हे मिसाईल चुकून उडाल्याचे मान्य नाही.
मात्र यावर अधिकृत सरकारी पातळीवर मात्र शांततेचे धोरण ठेवण्यात येते आहे. यावर अधिक काही बोलल्यास हे प्रकरण आणखी गंभीर होऊ शकते, या जाणीवेने ही शांतता पसरलेली दिसते आहे.