घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
फेसबुक आणि गुगल यांनी भारतातून एका वर्षात २३२१३ कोटी रुपयाचे केवळ जाहिरातींचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतीत त्यांनी भारतातील पारंपारिक डिजिटल प्रसारमाध्यमांना खुप मागे टाकले आहे. डिजिटल जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसूलाचा ८० टक्के वाटा या दोन कंपन्यांना मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच काळात भारतातील पहिला दहा पारंपारीक माध्यम कंपन्यांना जाहिरातींमधून मिळालेला एकुण महसूल ८३९६ कोटी रुपये इतका आहे. एकुणच भारतातील पारंपारिक डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी ही चिंतेची बाब आहे.
भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक भांडवल असलेल्या झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसचा गेल्या आर्थिक वर्षातील एकुण महसूल ७७२९ कोटी होता,परंतू यातील जाहिरातींपोटी मिळालेला महसूल ३७१० कोटी इतकाच होता. याउलट फेसबुकने याच काळात जाहिरातींपोटी ९३२६ कोटी तर गुगलने १३८८७ कोटी रुपये कमावले.
भारताच्या बाजारपेठेतून या परदेशी कंपन्या ऐवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना येथील स्थानिक प्रसारमाध्यमे मात्र त्यांच्या स्पर्धेत खुपच मागे पडत असल्याचे चित्र आहे.