माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
नीरा खोऱ्यातील चारही धरणे पूर्ण भरल्याने वीर धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात आलेल्या विसर्गात बदल करून 23 हजार 185 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीपात्रात कोणीही जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
इंदापूर बारामती तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असली, तरी नद्या मात्र दुथडी भरून वाहणार आहेत. त्यापैकीच नीरा नदी आता दुथडी भरून वाहणार आहे. ही घटना दुसऱ्यांदा घडते आहे. धरण खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे दरवर्षी नीरा नदीला पूर येतो. आताही आज 4 हजार 637 क्युसेक्स विसर्गवरून आता 23 हजार पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीचे पात्र दुथडी भरून वाहणार आहे.
जलसंपदा विभागाने यासंदर्भात नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज एका दिवसात वीर धरणाच्या सांडव्यातून तब्बल अठरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढला. दरम्यान भाटघर धरण, नीरा देवघर धरण, गुंजवणी आणि वीर ही चारही धरणे पूर्ण भरलेली असल्यामुळे निरा डाव्या कालव्यातून 827 तर उजव्या कालव्यातून 599 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.