बारामती: महान्यूज लाईव्ह
योगायोगाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस! गेल्या सहा वर्षांपासून या वाढदिवसाची चर्चा होते, कारण या एकाच दिवशी राष्ट्रवादी आणि भाजप या परस्परविरोधी राजकीय पक्षांमध्ये समर्थकांसाठी हा दिवस प्रसन्न दिवस असतो आणि या दिवसाच्या निमित्ताने अनेक जण या दोघांनाही शुभेच्छा देत असतात. आज भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खास लेख लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस हेच मराठ्यांचे कैवारी आहेत हे अधोरेखित केले आहे.
संजय काकडे यांनी त्यांच्या लेखात काय लिहिले आहे ते पाहूयात. काकडे यांनी आज या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत आठवणीतली छायाचित्रे अपलोड करून त्याची फेसबुक वर सुंदर पोस्ट लिहिली आहे. संजय काकडे यांनी लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी, काकडे यांनी या लेखाला शीर्षक दिले आहे, मराठ्यांचा कैवारी, देवेंद्र फडणवीस!
काकडे लिहितात, 21 व्या शतकातील महाराष्ट्राचा विकासपुरुष म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचे नाव सर्वांत आघाडीवर घेतले जाईल. चारित्र्य संपन्न व स्वच्छ प्रतिमा असलेल्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची मुहुर्तमेढ 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री म्हणून रोवली. शेती, उद्योग- व्यापारासंबंधी अनेक महत्वपूर्ण योजना राबवितानाच अनेक वर्षे खितपत पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी अतिशय कल्पकपणे व कायदेशीरदृष्ट्या सोडवला.
महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु, एकानेही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाहीत. फडणवीस साहेबांनी मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. ते खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत.
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने अफाट निर्णय क्षमता असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्णयक्षम व विकासाभिमुख सरकार काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचे अभूतपूर्व असे 57 मोर्चे आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात निघाले. कोट्यावधी मराठा समाज रस्त्यावर आला होता. महाराष्ट्रामध्ये भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार होते.
त्यामुळे ही आंदोलनं, मोर्चे सरकारच्या विरोधातच होती. या आंदोलनाविषयी आकस न बाळगता तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मराठा समाजाचा आक्रोश समजून घेतला. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी मराठा समाजाच्या परिस्थितीचे अवलोकन करून माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे मराठा समाजात देखील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांची संख्या मोठी असून त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे सिद्ध झाले. आणि त्याच आधारे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने कायद्याचा आधार घेत फडणवीसांनी मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) कोट्यातून 16 टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये दिले होते. जे उच्च न्यायालयाने अनुक्रमे 12 आणि 13 टक्के केले. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे फडणवीसांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आणि सर्वोच्च न्यायालयात हे मराठा आरक्षण टिकले नाही.
मुंबई, नागपूरसह पुणे शहरात अत्याधुनिक मेट्रो सेवा, ई-बस योजनांची वेगाने अंमलबजावणी करण्याचे श्रेय फडणवीस साहेबांना द्यायला हवे. मेट्रो जमिनी खालून की वरुन यामध्ये आघाडी सरकारने त्यांची 15 वर्षाची सत्ता केवळ चर्चेत घालवली. फडणवीस साहेबांनी मात्र, पाच वर्षांच्या कालावधीतच या योजना केंद्र सरकारकडे अर्थात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडे पाठपुरावा करून जलदगतीने मार्गस्थ केल्या.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार योजना सुरु केली. ग्रामीण महाराष्ट्र व शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीचे सर्वदूर कौतुक झाले. शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबवली. शेतीमालाला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केल्याने भ्रष्टाचाराला आळा बसला.
पुणे शहराचे स्थान हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर, देशाच्या आणि जगाच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. शिक्षण, आयटी, ऑटोमोबाईल उद्योगाच्या दृष्टीकोनातून पुणे शहराचं स्थान मोठं आहे. या कारणास्तव पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता, त्याची गरज मोठी होती. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारकडे पाठपुरावा करून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याचा मार्ग मोकळा केला. पुण्यासह नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निर्णयदेखील केला. त्यास सर्व परवानग्या मिळवल्या. निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आणि केंद्र सरकारशी निगडीत योजनांसंबंधी त्यांच्याकडे पाठपुरावा करणे यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एकदम परफेक्ट मुख्यमंत्री. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पुरंदर येथे मंजूर झालेले आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याचा मार्गात सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने संभ्रम निर्माण केला आहे.
मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून, मॅग्नेटिक महाराष्ट्र सारख्या महत्वाकांक्षी उपक्रमातून महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटींग करण्याचे काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या भागात उद्योग-व्यापाराला मोठी चालना मिळाली.
माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना हक्काचं घर असावं, कोणीही घराशिवाय या देशात राहता कामा नये या उद्देशातून सुरु केलेल्या पंतप्रधान आवास योजनेची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रात अतिशय उत्तमपणे अंमलबजावणी केली. या योजनेंतर्गत हजारोंना हक्काचं घर मिळालं.
स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होताच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आणि महाराष्ट्राला निर्णयक्षम, विकासाभिमुख, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य आणि शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत महाराष्ट्राची नवनिर्मिती आणि सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात केला. जात, धर्म, पंथ विरहीत केवळ महाराष्ट्राच्या हिताचे, भल्याचे आणि विकासाचे निर्णय घेऊन केलेल्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही. आधुनिक महाराष्ट्राची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा!
आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे कदाचित या विषयावर राजकीय वादळे उठणार नाहीत, परंतु येत्या एक-दोन दिवसात यावर राजकीय चर्चा घमासान होण्याची चिन्हे आहेत.











