विक्रम वरे, बारामती
बारामतीत सन २०१६ मध्ये उत्पन्न होते १८ कोटी. ते उत्पन्न आता ३३० कोटींवर पोचले, मात्र या शहरात मी टप्प्याटप्प्याने ३ हजार कोटींचा निधी आणून विकासाची कामे झाली. शहरात जवळपास २६९ विकासकामे झाली. आता १६७ विकासाची कामे सुरू आहेत. एकूणच ४३३ सर्व कामे हाती घेतली आहेत. ही फक्त बारामतीची नाही, तर बारामतीच्या विकासाची निवडणूक आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना त्यांनी विकासाभिमुख विचार मांडत, ही निवडणूक केवळ बारामतीची नसून बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठीची निवडणूक आहे, असे स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, पौर्णिमा तावरे नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या, त्याला आता दहा वर्षे झाली आहेत. या काळात बारामतीत अनेक विकासकामे झाली, पण अजून खूप काही करायचं बाकी आहे. बारामती हे आपलं घर आहे इथला प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबाचा भाग आहे.
ते पुढे म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत बारामती नगरपालिकेचे उत्पन्न सुमारे ३०० कोटी रुपये इतके झाले आहे, मात्र आपण सर्वांनी मिळून बारामतीमध्ये ३,३०० कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत.हा फरक आपल्या नियोजनक्षमतेचा आणि लोकांच्या विश्वासाचा पुरावा आहे.”
पवार यांनी सांगितले की, शहरात अनेक नवीन उपक्रम सुरू आहेत, त्यामध्ये नवीन बगीच्यांची उभारणी, पायाभूत सुविधा मजबूत करणे, स्वच्छता आणि सौंदर्यीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे.जेवढं काम केलं, तेवढं अजून कमीच आहे.आपल्याला बारामतीला आधुनिक आणि आदर्श शहर बनवायचं आहे, असेही त्यांनी म्हटले.
उमेदवारी संदर्भात त्यांनी स्पष्ट केले की, जे उमेदवारी मागतात, त्यांना निवडून आल्यानंतर जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. घरपट्टी, पाणीपट्टी यांसारख्या थकबाकी वेळेवर भरल्या पाहिजेत. काही माजी नगरसेवक ‘दादा, शेवटची संधी द्या’ असं म्हणत आहेत, पण आपण सर्वांनी एकत्र राहून योग्य लोकांची निवड करायला हवी.
या वेळी त्यांनी विरोधकांवरही टीका करत म्हटलं, काही जण आपल्या विरोधात एकत्र येऊन पॅनल बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जनतेचा विश्वास आपल्यावर आहे.बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३२५ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे, तर मतदारसंख्या सुमारे १ लाख २ हजार इतकी आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला, तुम्ही मला आणि माझ्या घड्याळाला (एनसीपीच्या चिन्हाला) साथ द्या. प्रत्येकजण ताकदीचा आहे, पण मी सगळं बारकाईने पाहतो आहे.चला, बारामतीच्या विकासासाठी एकदिलाने काम करूया. असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.











