बीड : महान्यूज लाईव्ह
शाही लग्नसोहळ्यांमध्ये वाढत चाललेल्या दिखाऊ आतिषबाजीचा आणखी एक धक्कादायक परिणाम बीडमध्ये समोर आला आहे. बार्शी रोड परिसरातील एका मंगल कार्यालयात सुरू असलेल्या विवाह समारंभात कोल्ड फायर फटाक्यांचा अचानक भीषण स्फोट होऊन पाच फोटोग्राफर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका फोटोग्राफरची प्रकृती गंभीर असून लाखो रुपयांचे कॅमेरे व शूटिंग साहित्य जळून खाक झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील बार्शी रोडवरील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा सुरू होता. वर-वधूच्या ग्रँड एन्ट्रीसाठी स्टेज परिसरात कोल्ड फायर इफेक्ट आणि फटाक्यांची विशेष आतिषबाजी करण्यात आली होती. त्यावेळी अचानक फटाक्यांच्या मशीनमध्ये स्फोट झाला आणि आगीचे लोळ व धुराचे ढग संपूर्ण स्टेज परिसरात पसरले. काही क्षणांतच लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
या स्फोटावेळी स्टेजसमोर उभे राहून शूटिंग करणारे फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर थेट आगीच्या तडाख्यात सापडले. यात पाच जण जखमी झाले असून फोटोग्राफर अभिषेक कदम हे गंभीर भाजले गेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यासह डोळे आणि शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अभिषेक कदम यांचा स्वतःचा विवाह काही दिवसांवर आल्याने या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.
दुर्घटनेत अनेक महागडे कॅमेरे, लाईट्स, ड्रोन आणि शूटिंग उपकरणे आगीत जळून नष्ट झाली. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दुर्घटनेने लग्नसमारंभांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. फोटोग्राफर असोसिएशनने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
आयोजक, इव्हेंट मॅनेजमेंट टीम आणि फटाके हाताळणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. कोल्ड फायर हे नाव जरी सुरक्षिततेचा आभास निर्माण करत असले तरी चुकीची हाताळणी, निकृष्ट दर्जाचे साहित्य किंवा सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणे ठरू शकते असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शोबाजीसाठी जीव धोक्यात घालणारे लग्नसोहळे अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने अशा कार्यक्रमांमध्ये फटाके व कोल्ड फायर वापराबाबत कठोर नियम लागू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.











