बार्शी : महान्यूज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर रविवारी एका थरारक आणि संतापजनक घटनेने हादरून गेले. प्रेम करून संसार थाटलेल्या एका नवविवाहितेचा तिच्याच पतीने भर रस्त्यात निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अवघ्या महिनाभरापूर्वी एकमेकांच्या गळ्यात हार घालणाऱ्या या जोडप्याच्या नात्याचा शेवट रक्ताच्या थारोळ्यात झाला आणि बार्शी शहर सुन्न झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मयत विवाहितेचे नाव धनश्री पाटील असे असून आरोपी पतीचे नाव ऋषिकेश पाटील आहे. दोघांनी प्रेमविवाह केला होता.
मात्र लग्नाला एक महिनाही पूर्ण झाला नसताना संसाराचा हा प्रवास थेट मृत्यूच्या दारात जाऊन संपला. दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. संशय, मतभेद आणि सतत होणारे वाद यामुळे नात्यात तणाव निर्माण झाला होता. रविवारी भर रस्त्यात दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, संतापलेल्या ऋषिकेशने धनश्रीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षरशः हैवानासारखा वागत होता. रस्त्यावर आरडाओरडा सुरू असताना धनश्री जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. मात्र आरोपीने कोणतीही दया न दाखवता तिच्यावर वार सुरूच ठेवले. रक्ताच्या थारोळ्यात ती रस्त्यावर कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी अवस्थेत धनश्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
घटनेनंतर बार्शी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी ऋषिकेश पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमका वाद कशामुळे झाला? याचा तपास केला जात आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, दोघांमधील संभाषण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वैवाहिक तणाव या सर्व मुद्द्यांवर पोलिस तपास करत आहेत.
या घटनेमुळे बार्शी शहरात संतापाची लाट उसळली आहे. प्रेमविवाहाचा एवढा भयानक शेवट होऊ शकतो का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच हातात मेहंदी आणि डोळ्यांत संसाराची स्वप्ने घेऊन नवजीवन सुरू करणाऱ्या धनश्रीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला.
एकीकडे समाज आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे संशय, अहंकार आणि संताप यामुळे नात्यांचा होत असलेला हिंसक अंत पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रेम, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याच्या शपथा घेणाऱ्या नात्याचा शेवट एवढ्या क्रूरतेने होणे ही केवळ बार्शी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अस्वस्थ करणारी घटना ठरत आहे.










